कर्णधार शिखर धवन याने केलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर दिल्लीने महाराष्ट्राचा सात गडी राखून पराभव करीत रणजी क्रिकेट सामन्यात निर्णायक विजय मिळविला. दिल्लीने सहा गुणांची कमाईही केली.
गोलंदाजीस अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर शेवटच्या दिवशी मात्र दिल्लीच्या फलंदाजांनी निर्विवाद वर्चस्व गाजविले. विजयासाठी २७० धावांचे आव्हान त्यांनी केवळ तीन गडय़ांच्या मोबदल्यात पार केले. त्याचे श्रेय धवन याच्या नाबाद ११६ धावांना द्यावे लागेल. त्याने मोहित शर्माच्या साथीत ९४ धावांची भागीदारी केली, तर मिथुन मनहासच्या साथीत त्याने ८३ चेंडूंमध्ये ८३ धावांची भर घातली. धवनच्या शैलीदार फलंदाजीमुळेच एकवेळ अवघड वाटणारा विजय दिल्लीने सहज मिळविला. धवन याने वैभव रावल (नाबाद ३५) याच्या साथीत ९१ धावांची अखंडित भागीदारी करीत संघाच्या विजयावर मोहोर चढविली.
धवन याने प्रथम दर्जाच्या क्रिकेट कारकीर्दीतील १६ वे शतक टोलविताना १९४ चेंडूंमध्ये १२ चौकारांबरोबरच एक षटकारही मारला. शर्मा याने सुरेख फटकेबाजी करीत ५१ धावा केल्या. मनहास याने महाराष्ट्राच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत ४० चेंडूंमध्ये ५१ धावा केल्या. त्यामध्ये त्याने तीन षटकार व पाच चौकार अशी टोलेबाजी केली. हे तीन षटकार त्याने निकित धुमाळ याच्या गोलंदाजीवर मारले.
दिल्लीने या सामन्यातील सहा गुणांसह आपली गुणसंख्या १७ केली आहे. त्यांचा शेवटचा साखळी सामना नागपूर येथे विदर्भविरुद्ध होणार आहे. या सामन्यात त्यांनी विजय मिळविला तर बाद फेरीत स्थान मिळविण्याची त्यांना संधी आहे. महाराष्ट्राला या सामन्यात एकही गुण मिळवता आला नसून बाद फेरीच्या त्यांच्या आशा जवळजवळ संपुष्टात आल्या आहेत.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र १९६ व २६६
दिल्ली १९३ व ३ बाद २७३ (शिखर धवन नाबाद ११६, मोहित शर्मा ५१, मिथुन मनहास ५१)   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Century by shikhar dhavan delhi won against maharashtra
First published on: 19-12-2012 at 07:59 IST