दिलीप वेंगसरकर विराट खेळाडू म्हणून किती मोठा आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. फलंदाज म्हणून विराटची कामगिरी आणि त्याची तंदुरुस्ती यामुळे तो अनेकांचा आदर्श आहे. त्याने ५० एकदिवसीय शतकांचा विक्रम रचला यात नवल नाही. मुंबईतील दमट वातावरणाने विराटच्या तंदुरुस्तीची कसोटी पाहिली, पण त्यानेही जिद्द सोडली नाही. विराटने संपूर्ण विश्वचषकात अप्रतिम खेळ केला आहे. न्यूझीलंडविरुद्धचे त्याचे शतकही उत्कृष्ट होते. रोहितने सुरुवातीला आक्रमक खेळ करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा मारा बोथट केला आणि त्याने रचलेल्या पायावर विराटने कळस चढवला. विराटची तंदुरुस्ती आणि फलंदाजी या दोन्ही बाबी अप्रतिम होत्या. मुंबईतील वातावरणात फलंदाजाला मोठी खेळी करणे सोपे नव्हते. मात्र, परिस्थिती आणि खेळपट्टी ओळखूनच विराटने फलंदाजी केली. शतकी खेळी करताना कोणत्याही फलंदाजाला चांगल्या सहकार्याची अपेक्षा असते, ती साथ त्याला श्रेयस अय्यरने दिली. हेही वाचा >>> World Cup Semi Final : “तुम्ही फायनल बघू नका”, भारताच्या विजयावरील अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्रियेनंतर चाहत्यांची विनंती विराट हा सामन्याच्या अतिशय निर्णायक क्षणी खेळण्यास मैदानात उतरला. १५ ते ४० षटके ही सामन्याचे चित्र स्पष्ट करणारी असतात. विराटने आपल्या खेळीदरम्यान चांगला संयम दाखवला. शतकही त्याने कमी चेंडू खेळताना पूर्ण केले. त्याने धोका न पत्करताही शतक झळकावता येऊ शकते, हे दाखवून दिले. माझ्या मते, विराटची ही खेळी पाहून युवा क्रिकेटपटूंना खूप काही शिकता येऊ शकते. त्याने आपल्या खेळीमध्ये कोणत्याही क्षणी चुकीचे फटके मारले नाहीत. तो कधीही दडपणाखाली दिसला नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाजी कशी करावी याचे हे एक उत्तम उदाहरण होते. विक्रम हे मोडण्यासाठीच असतात. प्रत्येक विक्रम आज ना उद्या मोडला जाणार आहे. मी लॉर्ड्सवर तीन शतके झळकावली आहेत. तो विक्रमही कधीतरी मोडला जाईल. मात्र, विक्रम रचण्यासोबत तुम्ही खेळाडू म्हणून संघाला सामने जिंकवून देणे महत्त्वाचे असते. तुमच्या विक्रमाचा संघाला किती फायदा झाला, याने खेळाडूचे वेगळेपण ठरते. विराटला हीच गोष्ट अद्भुत आणि अद्वितीय बनवते. (लेखक भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आहेत.)