भारतीय संघाच्या निवडसमितीच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत असणाऱ्या अजित आगरकर याचा आज वाढदिवस आहे. ४ डिसेंबर १९७७ रोजी आगरकरचा जन्म मुंबईत झाला होता. वाढदिवसानिमित्ताने अजित आगरकरच्या कारकीर्दीचा घेतलेला आढावा. एकवेळ दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून आगकरकडे पाहिलं जात होतं. पण भारतीय संघानं फलंदाजीपेक्षा गोलंदाज म्हणून त्याचा वापर केला. आगरकरनं आपल्या फलंदाजीची चुणूक अनेकवेळा दाखवून दिली होती. सचिनपासून विराट कोहलीपर्यंत दिग्गज खेळाडूंना न जमलेला विक्रम आगरकरनं करुन दाखवला आहे.

क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर आगरकरनं शतकी खेळी केली आहे.  आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या आगरकरने १६ चौकारांसह नाबाद १०९ धावांची खेळी केली. लॉर्ड्सवर शतक झळकवावं असं अनेकांचं स्वप्न असतं मात्र मोठमोठ्या फलंदाजांचं हे स्वप्न साकार झालेलं नाही. यामध्ये सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, एबी डीव्हिलियर्स, जॅक कॅलिस, युनिस खानआणि विराटसह अनेक दिग्गज खेळाडूंची नावं आहेत. लॉर्ड्सवर मंकड, दिलीप वेंगसरकर, गुंडप्पा विश्वनाथ, रवी शास्त्री, मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली, राहुल द्रविड, अजित आगरकर आणि अजिंक्य रहाणे या भारतीय फलंदाजांनाच शतक झळकावता आलं आहे.अजित आगरकर याने १९९८ ते २००७ या कालावधीत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. या काळात त्याने २६ कसोटी सामन्यांमध्ये ५७१ धावा केल्या. १९१ एकदिवसीय सामन्यात २८८ विकेट घेतल्या तर १२६९ धावा चोपल्या आहेत. तर ४ टी २० सामन्यात १५ धावा केल्या आहेत.

आगरकरच्या नावावर असणारे विक्रम –
१) एकदिवसीय सामन्यात २१ चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे. भारताकडून सर्वात वेगवान अर्धशतक आहे.

२) एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वात वेगवान ५० विकेट घेण्याचा विक्रमही आगरकराच्या नावावर आहे. आगरकरनं २३ सामन्यात ५० विकेट घेण्याचा कारनामा केला होता.

३) एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक वेळा ४ बळी घेण्याचा विक्रम आगरकरच्या नावावर आहे. आगरकरनं १९१ सामन्यात १२ वेळा चार विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे.