#HappyBirthdaySachin : भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर. २०१३ साली मुंबईच्या वानखेडे मैदानावर तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण त्याची प्रत्येक खेळी ही क्रिकेटप्रेमींच्या मनावर अजूनही अधिराज्य गाजवत आहे. सचिनने भारताला जगाच्या पटलावर नाव मिळून दिले. त्याने आपल्या २४ वर्षांच्या कारकिर्दीत क्रिकेटला एक नवे स्थान मिळवून दिले. सचिन निवृत्त झाला असला, तरी सचिनला पाहून आजही भारतातील अनेक तरुण क्रिकेटपटू बनण्यासाठी बॅट हातात घेतात. क्रिकेटचा देव सचिन याचा आज ४६ वा वाढदिवस आहे. सचिनच्या चाहत्यांसाठी जरी हे त्याचे वय असले, तरी सचिनचा जुना सहकारी वीरेंद्र सेहवाग याला या आकड्यामध्ये स्कोरकार्ड म्हणजेच धावफलक दिसत आहे. सेहवागने ट्विट करत ४६ हा केवळ आकडा नसून त्यात मला ४ (चौकार) आणि ६ (षटकार) असा धावफलक दिसतो. (क्रिकेटच्या) मास्टरसोबत खेळून माझी कारकीर्द बहरली, असे म्हटले आहे. तसेच 'सचिनमुळे पृथ्वी ४६ वर्षांपासून पावन होत आहे. सचिनसोबत क्रिकेट खेळताना सुरुवातीला धावफलक हा ४ आणि ६ च्या पटीत वाढायचा. सचिन पाजी, तुझे आयुष्य विविध प्रकारे अजून बहरत राहो. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!', असे सेहवागने लिहिलं आहे. With the Master, the Rise is Faster ! 46, as much as it represents the years you have blessed this planet, for me 4 6 is more about how the scorecard read at beginning of the over when you batted. May you continue to manifest your strength in innumerable ways #HappyBirthdaySachin pic.twitter.com/y5Ld3t0Ar0 — Virender Sehwag (@virendersehwag) April 24, 2019 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतक झळकावणाऱ्या पहिल्या आणि एकमेव खेळाडूच्या नावावर अनेक विक्रम आहेत. पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा सचिन हा पहिला क्रिकेटपटू आहे. त्याच्यानंतर वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, मार्टिन गप्टील या खेळाडूंनी द्विशतके झळकावली. पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावता येते, हा विश्वास सचिनने क्रिकेटपटूंमध्ये निर्माण करून दिला. २४ फेब्रुवारी २०१० ला सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अशक्यप्राय वाटणारी एक गोष्ट शक्य करून दाखवली. सचिनने ग्वालेरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले द्विशतक झळकावले. त्याने केवळ १४७ चेंडूत ही द्विशतकी खेळी साकारली होती. या खेळीत त्याने २५ चौकार आणि ३ षटकारांची आतषबाजी केली होती. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ४०१ धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या फलंदाजांना मात्र २४८ धावांतच गाशा गुंडाळावा लागला होता. हा सामना भारताने १५३ धावांनी जिंकला होता. द्विशतकी खेळी करणाऱ्या सचिनला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले होते.