क्रिकेटमध्ये चेंडूची चमक कायम राखण्यासाठी चेंडूवर थुंकी लावण्याची पद्धत आहे. मात्र आता लवकरच ही पद्धत बंद होण्याची शक्यता आहे. अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखालील ICC च्या क्रिकेट समितीने करोनाच्या भीतीमुळे ही पद्धत बंद करण्याची शिफारस केली आहे. चेंडूची चमक कायम ठेवण्यासाठी घामाचा वापर करण्याबाबत मात्र कोणताही धोका दिसत नसल्याचे मत क्रिकेट समितीने व्यक्त केले आहे.
“आफ्रिदी गेला खड्ड्यात… देशासाठी मी बंदूकही उचलेन”
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून क्रिकेट समितीची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत क्रिकेट मालिकेसाठी केवळ यजमान देशाचेच पंच अंपायरिंग करण्याचा प्रस्ताव देखील ठेवण्यात आला. आतापर्यंत क्रिकेट मालिकेसाठी तटस्थ पंच किंवा दोन संघाच्या देशाचे पंच काम पाहात होते, पण आता यापुढे केवळ यजमान देशाचेच पंच अंपायरिंग करताना दिसण्याची शक्यता आहे. याचसोबत प्रत्येक डावात गोलंदाजी आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला दोन-दोन DRS रिव्ह्यू देण्यात येतात, त्याची संख्या दोनवरून तीन करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
भर मैदानात युवराजला मिळाली होती जीवे मारण्याची धमकी
“सध्या आपण सारे खूप कठीण प्रसंगाला तोंड देत आहोत. अशा परिस्थितीमध्ये आज झालेल्या बैठकीत ठेवण्यात आलेले प्रस्ताव हे अंतरिम (तात्पुरत्या स्वरूपाचे) आहेत. सध्याच्या काळात सुरक्षितपणे क्रिकेट पुन्हा सुरू करण्याच्या उद्देशाने हे प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक क्रिकेट सामन्याशी संबंधित साऱ्यांच्याच सुरक्षिततेची जबाबदारी लक्षात घेता हे प्रस्ताव पुढे करण्यात आले आहेत. ICC च्या वैद्यकीय सल्लागार समितीचे प्रमुख डॉ. पीटर हारकोर्ट यांनी करोनाचा प्रसार लाळेवाटे किंवा थुंकीवाटे होण्याची शक्यता आहे अशी माहिती दिली. त्यामुळे क्रिकेट समितीतील सर्वांनी एकमताने चेंडूवर थुंकी लावण्याची पद्धत बंद करण्याची शिफारस केली आहे. चेंडूवर घाम लावल्याने करोना संक्रमण किंवा प्रसाराचा कोणताही धोका नसल्याचेही वैद्यकीय समितीने सांगितले आहे. त्यामुळे गोलंदाज घामाचा वापर करून चेंडूची चमक कायम ठेवू शकतात”, अशी माहिती अनिल कुंबळे यांनी ICC ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकाच्या माध्यमातून दिली.