टी-२० विश्वचषकातील निराशाजनक कामगिरी विसरून भारतीय संघ नव्या प्रवासाकडे वळला आहे. बुधवारी जयपूर येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पाच गडी राखून पराभव केला. पूर्णवेळ टी-२० कर्णधार रोहित शर्मा आणि नवीन मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली भारताचा हा पहिला विजय होता.

आता या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी रांचीमध्ये होणार आहे. भारताच्या विजयात सूर्यकुमार यादवने महत्त्वाची भूमिका बजावली, त्याने ६२ धावांची शानदार खेळी केली. याशिवाय कर्णधार रोहित शर्मानेही ४८ धावांचे योगदान दिले.

दरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने इन्स्टाग्रामवर १५ वर्षे जुना फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये रोहित शर्मा आणि दीपक चहर दिसत आहेत. हा फोटो जयपूरच्याच स्टेडियममधला आहे. चहरने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ”जवळपास १५ वर्षांनंतर त्याच मैदानावर आमचा फोटो. त्यावेळी मला आणि रोहित भाईला दाढी नव्हती.”

हेही वाचा – रचिन नावाचा अर्थ तरी काय?; जाणून घ्या न्यूझीलंडच्या ‘या’ २२ वर्षीय खेळाडूचं द्रविड कनेक्शन

न्यूझीलंडविरुद्धच्या या पहिल्याच सामन्यात दीपक चांगलाच महागात ठरला. चहरने चार षटकांत ४२ धावा देत एक बळी घेतला. या खराब गोलंदाजीनंतरही चहरला ‘अमेझिंग मोमेंट अवॉर्ड’ देण्यात आला. गप्टिलला बाद केल्यानंतर त्याच्या प्रतिक्रियेसाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आला.

असा रंगला सामना…

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडकडून सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि मार्क चॅपमन यांनी अर्धशतके ठोकली. या दोघांच्या कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडने २० षटकात ६ बाद १६४ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवने अर्धशतक ठोकले तर, रोहितने ४८ धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात १० धावांची गरज असताना पदार्पणवीर व्यंकटेश अय्यर आणि ऋषभ पंत यांनी चौकार ठोकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सूर्यकुमारला सामनावीर पुरस्कार मिळाला. या विजयासह भारताने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.