भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने पार पडले आहेत. यातील दोन्ही सामने जिंकून भारताने मालिका जिंकली आहे. या मालिकेतील दुसरा सामना रांची येथे खेळला गेला, ज्यामध्ये भारताने न्यूझीलंडचा सात विकेट्सने पराभव केला. हा सामना पाहण्यासाठी काँग्रेस नेते शशी थरूरही स्टेडियममध्ये पोहोचले होते. त्यांनी त्‍याच्‍या सोशल मीडिया अकाऊंटवर मैदानातील काही फोटो शेअर केले आहेत. यासोबतच त्यांनी कप्तानपदाबाबत एक मागणी केली आहे.

तिसऱ्या टी-२० सामन्यात रोहितच्या जागी श्रेयस अय्यरला भारताचा कर्णधार बनवण्यात यावे आणि या सामन्यात सर्व वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात यावी, अशी मागणीही थरूर यांनी केली आहे. सामन्यानंतर थररू ट्वीटमध्ये म्हणाले, “भारताने मालिका जिंकली हे पाहून आनंद झाला. गेल्या दोन सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आम्ही विश्रांती दिली पाहिजे. रोहित, राहुल, ऋषभ, भुवनेश्वर आणि दीपक चहर यांच्या जागी बेंचवर बसलेल्या खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे.”

भारताच्या सध्याच्या टी-२० संघात अनेक खेळाडू आहेत, ज्यांचा कसोटी संघातही समावेश आहे आणि त्यांना न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. यानंतर त्याला दक्षिण आफ्रिकेचा दौराही करावा लागणार आहे. हे सर्व खेळाडू नुकतेच आयपीएल आणि टी-२० विश्वचषक खेळल्यानंतर आले आहेत. या खेळाडूंना विश्रांतीची गरज आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मासह अनेक खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. लोकेश राहुल हा सामना खेळला, तर तो संघाचे नेतृत्व करेल, कारण तो भारताच्या टी-२० संघाचा नियमित उपकर्णधार आहे. त्याच्या अनुपस्थितीत अय्यरला कर्णधारपद दिले जाऊ शकते.

हेही वाचा – विराटच्या अनुपस्थितीत रोहितनं केलेलं ‘ते’ वक्तव्य गाजतंय; म्हणाला, ‘‘खेळाडूंना स्वातंत्र्य…”!

आयपीएलमध्ये दिल्ली संघाचा कर्णधार असताना श्रेयस अय्यरने चमकदार कामगिरी केली आहे. मात्र, दुखापतीनंतर पंतला कर्णधार बनवण्यात आले आणि नंतर त्याला संघाचा नियमित कर्णधार बनवण्यात आले. अय्यरने देशांतर्गत सामन्यांमध्येही कर्णधारपद भूषवले असून चांगली कामगिरी केली आहे. भविष्यात राहुल आणि पंत यांच्याशिवाय भारतीय संघ कर्णधारपदाच्या शक्यता शोधत आहे. मात्र, अय्यरला कोणत्याही फॉरमॅटमध्ये टीम इंडियामध्ये आपले स्थान पक्के करता आलेले नाही. दुखापत होण्यापूर्वी त्याने चौथ्या क्रमांकावर चांगली कामगिरी केली होती आणि अनेक चांगल्या खेळी खेळल्या होत्या, मात्र सूर्यकुमार आल्यानंतर तो संघाबाहेर गेला.