पहिल्या सत्रात पिछाडीवर असणाऱ्या भारताने इराणवर रोमहर्षक विजय मिळवला आहे. भारताने इराणवर ३८-२९ असा शानदार विजय मिळवला आहे. दुसऱ्या सत्रात जबरदस्त पुनरागमन करत भारताने जग जिंकले आहे. भारताने सलग तिसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. पहिल्या सत्रात भारत १८-१३ ने पिछाडीवर होता. भारतीय चढाईपटूंना फारसे यश मिळत नसताना बचावदेखील फारसा प्रभावी ठरत नव्हता. मात्र दुसऱ्या सत्रात भारताने सर्वच आघाड्यांवर दमदार कामगिरी केली. अजय ठाकूरने अप्रतिम चढाया करत गुणांचा सपाटा लावला. अजयच्या यशस्वी चढायांमुळे भारताने इराणची आघाडी हळूहळू कमी केली. यानंतर भारताच्या बचावपटूंनी इराणच्या चढाईपटूंना निष्प्रभ करण्यास सुरुवात केली. चढाईपटू हल्लाबोल करत असताना भारतीय बचावपटूंनी देखील शानदार कामगिरी केली. त्यामुळे भारताने आघाडी घेतली. हळूहळू भारताची आघाडी वाढत गेली. पहिल्या सत्राच्या अखेरीस १८-१३ ने पिछाडीवर असणारा भारतीय संघ दुसऱ्या सत्रात इराणला भारी पडला. इराणचा कर्णधार मेराज शेखच्या दमदार कामगिरीमुळे पहिल्या सत्रात भारत अडखळताना दिसला. मात्र दुसऱ्या सत्रात चढाईपटू अजय ठाकूरने सामन्याचा नूर पालटून टाकला. भक्कम समजल्या जाणाऱ्या इराणच्या बचाव फळीला अजयने धक्के दिले. या धक्क्यांमुळे इराणचा आत्मविश्वास डळमळीत झाला. अजयने तब्बल १२ गुणांची कामगिरी करत भारताला महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. अजय ठाकूरला नितीन तोमरची तोलामोलाची साथ लाभली. नितीनने सहा गुणांची कमाई करत भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. इराणवर दोनवेळा लोण चढवताना नितीन तोमरची ही कामगिरी निर्णायक ठरली. २४ मिनिटांनंतर भारताच्या आक्रमणाची धार आणखी तीव्र झाली. भारतीय चढाईपटू इराणची बचाव फळी भेदत असताना भारतीय बचावपटूंनी इराणच्या चढाईपटूंना यश मिळू दिले नाही. अवघ्या ८ मिनिटांमध्ये भारताने तब्बल १२ गुणांची लयलूट केली. या ८ मिनिटांमध्ये इराणला अवघ्या २ गुणांची कमाई करता आली. चढाईपटूंच्या यशस्वी चढाया आणि त्याला बचावपटूंची लाभलेली सर्वांगसुंदर साथ यामुळे भारताने ३०-२४ अशी आघाडी घेतली. त्यानंतर भारताने ही आघाडी टिकवली. अखेर भारताने ३८-२९ असा विजय मिळवला. याआधी भारताने २००४ आणि २००७ मध्ये कबड्डी विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताने अंतिम फेरीत इराणचाच पराभव केला होता. आता तिसऱ्या विश्वचषकातही इराणला पाणी पाजत अनुप कुमारच्या संघाने कबड्डीमध्ये इतिहास रचला आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरातून भारतीय कबड्डी संघावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.