नवी दिल्ली : आशिया चषक महिला ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी बुधवारी जाहीर झालेल्या १५ सदस्यीय भारतीय महिला संघात दुखापतीतून सावरलेल्या जेमिमा रॉड्रिग्जचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेचे आयोजन १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान बांगलादेश येथे होणार आहे.

रॉड्रिग्जला मनगटाच्या दुखापतीमुळे सध्या सुरू असलेल्या इंग्लंड दौऱ्यात मुकावे लागले आहे. महिला हंड्रेड क्रिकेट स्पर्धेत नॉर्दन सुपरचार्जर्स संघाकडून खेळताना जेमिमाला ही दुखापत झाली होती. त्यानंतर तिने तीन आठवडे बंगळूरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीतून सावरण्याच्या दृष्टीने सराव केला.

या स्पर्धेसाठी इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेतील भारतीय संघ जेमिमा वगळता कायम ठेवण्यात आला आहे. तानिया भाटिया आणि सिमरन बहादूर यांचा राखीव खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. सहा वेळा जेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली सहभागी होईल. भारत आपल्या मोहिमेची सुरुवात श्रीलंकेविरुद्ध करेल. 

संघ :

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, सबिनेनी मेघना, रिचा घोष (यष्टीरक्षक), स्नेह राणा, दयालन हेमलता, मेघना सिंग, रेणुका ठाकूर, पूजा वस्त्रकार, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव, के.पी. नवगिरे.

राखीव खेळाडू : तानिया भाटिया, सिमरन दिल बहादूर.

जागतिक कसोटी अंतिम लढत ओव्हलवर

दुबई : जागतिक कसोटी अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतींसाठी ओव्हल आणि लॉर्डसची निवड करण्यात आली आहे. ओव्हलवर २०२३, तर लॉर्डसवर २०२५ मधील अंतिम लढत खेळविण्यात येईल. जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या आगामी दोन अंतिम लढती इंग्लंडमध्ये खेळविण्याचा निर्णय याच वर्षी जुलै महिन्यात घेण्यात आला होता.

बाबरला मागे टाकत सूर्यकुमार तिसऱ्या स्थानी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुबई : भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवने (७८० गुण) पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे टाकत बुधवारी ‘आयसीसी’च्या ताज्या ट्वेन्टी-२० क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे. सूर्यकुमारने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ४६ धावांची खेळी केली होती. दक्षिण आफ्रिकेचा एडिन मार्करम (७९२ गुणांसह) दुसऱ्या स्थानी आहे.