शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांच्या प्रभावी गोलंदाजीपुढे ब्रिस्बेन कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियानं २९४ धावांपर्यंत मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ३३ धावांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे चौथ्या कसोटीत ऐतिहासिक विजयासाठी भारतीय संघाला ३२८ धावांची आवशकता आहे. चौथ्या दिवसाचा उर्वरित खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. सामना थांबवण्यापूर्वी दुसऱ्या डावात भारतानं नाबाद चार धावा केल्या आहेत. भारतीय संघ अद्याप ३२४ धावांनी पिछाडीवर आहे.  बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका सध्या १-१ बरोबरीत आहे. पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियानं तर तुसऱ्या सामन्यात भारतानं विजय मिळवला होता. तिसरा कसोटी सामना भारतीय संघान अनिर्णीत राखला होता. त्यामुळे अखेरच्या कसोटी सामन्यात विजय मिळवून चषकावर नाव कोरण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असेल.

चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियानं आक्रमक फलंदाजी करत खोऱ्यानं धावा काढल्या आहेत. चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली. डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस हॅरिस यांनी तुफानी फटकेबाजी करत धावसंख्या वाढवली. वॉर्नर-हॅरिस यांनी पहिल्या विकेटसाठी ८९ धावांची भागिदारी केली.बॉर्डर गावसकर चषकातील ही पहिल्या विकेटसाठीची सर्वोत्तम भागिदारी ठरली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून स्टिव स्मिथनं सर्वाधिक ५५ धावा काढल्या. त्याव्यतिरिक्त डेव्हिड वॉर्नर (४८), हॅरिस (३८), लाबुशेन (२५), कॅमरुन ग्रीन(३७) आणि कर्णधार पेन (२७) यांनी झटपट धावा केल्या आहेत.

रोहित शर्माने केलेली ती कृती स्मिथची नक्कल की टोमणा?; ‘हा’ Video ठरतोय चर्चेचा विषय

भारतीय संघाकडून मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरनं प्रभावी गोलंदाजी केली. मोहम्मद सिराजनं पाच बळी मिळवले तर शार्दुल ठाकूरनं ऑस्ट्रेलियाच्या चार फलंदाजांन तंबूत धाडलं. अष्टपैलू संदुरला एक बळी मिळाला. गाबाच्या मैदानावर आतापर्यंत चौथ्या डावात २५० पेक्षा जास्त धावांचं आव्हान एकदाही कोणत्याही संघाला पार करता आलं नाही. शिवाय, मागील १०० वर्षात या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा संघ आतापर्यंत एकदाही पराभव झाला नाही. त्यामुळे  ब्रिस्बेनमधील गाबा मैदानावरील हा रेकॉर्ड भारतीय संघ मोडणार का? याकडे क्रीडा प्रेमींचं लक्ष लागलं आहे.