अनपेक्षित विजय नोंदविण्याबाबत ख्यातनाम असलेल्या मलेशियाविरुद्ध उपांत्य फेरीत भारताला विजय मिळविण्यासाठी शुक्रवारी सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. आशिया चषक हॉकी स्पर्धेत विजेतेपद मिळविण्याकरिता भारताला हा अडथळा पार करावा लागेल.
सरदारासिंग याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या भारताने या स्पर्धेत आतापर्यंत ओमान संघावर ८-०, गतविजेत्या दक्षिण कोरियावर २-० अशी मात केली होती. साखळी गटातील शेवटच्या लढतीत भारताने बांगलादेशचा ९-१ असा पराभव केला. साखळी सामन्यांमधील सातत्यपूर्ण खेळामुळे भारताचा आत्मविश्वास उंचावला आहे. मात्र उपांत्य फेरीत त्यांना यजमान मलेशियाचे आव्हान असणार आहे.मलेशियाने साखळी गटात चीन तैपेई व जपान यांच्यावर विजय मिळविला होता. तथापि त्यांना पाकिस्तानकडून पराभवाचा धक्का बसला होता. या स्पर्धेत विजेतेपद मिळविणाऱ्या संघाचे आगामी विश्वचषक स्पर्धेतील प्रवेश निश्चित होणार असल्यामुळे घरच्या मैदानावर मलेशिया विजेतेपदासाठी कसोशीने प्रयत्न करतील असा अंदाज आहे.
विश्वचषक स्पर्धेला १९७१ मध्ये सुरुवात झाली, तेव्हांपासून भारताने प्रत्येक वेळी या स्पर्धेची पात्रता पूर्ण केली आहे. २००८ मध्ये भारताला ऑलिम्पिक स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान मिळविण्यात अपयश आले होते. या नामुष्कीसारखी वेळ विश्वचषक स्पर्धेबाबत येऊ नये यासाठी भारतीय खेळाडू मनोमन प्रार्थना करीत असले तरी त्यांना मलेशियाविरुद्ध पूर्ण ताकदीनिशी खेळ करावा लागणार आहे. मलेशियावर मात करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. मलेशियाला घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा मिळणार असला तरी आम्ही त्याचे कोणतेही दडपण घेणार नाही. आम्ही आमच्या क्षमतेइतके कौशल्य दाखविण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे सरदारासिंग याने सांगितले.
गोलरक्षकांकडून सर्वोच्च कौशल्यकाढून घेण्यावर भर – स्टॅनीफोर्थ…
इपोह : हॉकीमध्ये गोलरक्षणास अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि मी भारतीय गोलरक्षकांकडून सर्वोच्च कौशल्य काढून घेण्यावर भर देणार आहे, असे भारतीय हॉकी संघाचे गोलरक्षणप्रशिक्षक डेव्ह स्टॅनीफोर्थ यांनी येथे सांगितले. दक्षिण आफ्रिकेचे माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू स्टॅनीफोर्थ यांच्याकडे गोलरक्षणाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ते म्हणाले, माझ्याकडे नुकतीच ही जबाबदारी आली आहे आणि अल्पशा काळात भारतास सर्वोच्च स्थानावर नेणे सोपे नाही. मात्र भारतीय खेळाडूंकडे चांगले नैपुण्य आहे आणि या नैपुण्यास योग्य दिशा देण्याचे काम मी करणार आहे. स्टॅनीफोर्थ यांनी हॉकी इंडिया लीगच्या वेळी रांची ऱ्हिनोज संघाचे प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. ते म्हणाले, प्रतिस्पर्धी खेळाडूंचे फटके रोखण्याबाबत मी या खेळाडूंना मार्गदर्शन देण्यावर भर देत आहे. भारतीय खेळाडूंकडे सर्वोत्तम कामगिरी करण्याची क्षमता आहे. भारताचा गोलरक्षक श्रीजेशविषयी विचारले असता ते म्हणाले, तो अतिशय अव्वल दर्जाचा गोलरक्षक आहे मात्र त्याचे पाय जमिनीवर असण्याची आवश्यकता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Aug 2013 रोजी प्रकाशित
आशिया चषक हॉकी स्पर्धा : भारतापुढे मलेशियाचे आव्हान
अनपेक्षित विजय नोंदविण्याबाबत ख्यातनाम असलेल्या मलेशियाविरुद्ध उपांत्य फेरीत भारताला विजय मिळविण्यासाठी शुक्रवारी सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे.
First published on: 30-08-2013 at 05:54 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian hockey team ready to lock horns with malaysia in asia cup semis