विराट कोहली यंदाच्या हंगामानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. शिवाय, तो आगामी टी-२० वर्ल्डकपनंतर भारताच्या टी-२० संघाच्या कप्तानपदावरूनही हटणार आहे. विराटच्या या निर्णयापाठी नक्की कोणते कारण होते, हे त्याने सांगितले नव्हते. परंतु आता त्याने आरसीबीचे कर्णधारपद सोडण्यामागचे कारण सांगितले आहे. इनसाइड आरसीबी शोमधील संभाषणादरम्यान विराट कोहलीने याबाबत खुलासा केला. तो म्हणाला, "दोन गोष्टी होत्या. सर्वात महत्वाचा घटक होता कामाचा ताण. मला माझ्या जबाबदाऱ्यांबाबत पूर्णपणे प्रामाणिक राहायचे आहे आणि मला माझे पूर्ण योगदान देता यावे, अशी माझी इच्छा आहे. मी यात १२० टक्के देऊ शकलो नाही तर मी ती गोष्ट सोडून देईन. मी अशी व्यक्ती नाही, जी फक्त चालवण्यासाठी ती गोष्ट करत राहीन. मी कोणत्याही गोष्टीशी पूर्णपणे संलग्न नाही." हेही वाचा - IPL 2021 : ‘‘त्याला स्वतः ला हे काम…”, धोनीचा फिनिशिंग टच पाहून सुनील गावसकरांनी व्यक्त केलं मत विराट कोहलीने आतापर्यंत आयपीएलचे एकही विजेतेपद जिंकलेले नाही. तो गेल्या अनेक मोसमांपासून आरसीबीचा कर्णधार आहे, पण असे असूनही त्याला संघाचे जेतेपद मिळवता आले नाही. या वेळी त्याच्या नेतृत्वाखाली आरसीबीचा संघ पुन्हा एकदा प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. आयपीएलनंतर भारतीय संघाला विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टी-२० विश्वचषक स्पर्धेतही सहभागी व्हायचे आहे.