RCB vs PBKS Final Who Will Win: अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल २०२५ चा अखेरचा सामना खेळला जात आहे. पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. क्वालिफायर वनच्या सामन्यात पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना अतिशय सुमार कामगिरी केली होती. संपूर्ण संघ ११० च्या धावावर गुंडाळला गेला होता. आज अंतिम सामन्यात श्रेयसने प्रथम गोलंदाजी करून धावांचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या १७ हंगामात टॉस जिंकणाऱ्या संघाने कितीवेळा आयपीएलची ट्रॉफी मिळवली? याबद्दल माहिती जाणून घेऊ.

आयपीएलच्या अंतिम सामन्याचा इतिहास सांगतो की, ज्या संघाने अंतिम सामन्यात टॉस जिंकला, त्या संघाला अधिक फायदा झालेला आहे. आतापर्यंत १७ पैकी १० वेळा टॉस जिंकलेला संघ अंतिम सामन्यात विजयी झालेला आहे. तर ७ वेळा टॉस हरलेल्या संघाने विजय मिळविला आहे.

आयपीएलच्या २०२४ च्या हंगामात श्रेयस अय्यर हा कोलकाता नाइट रायडर्स संघाचा कर्णधार होता. विशेष म्हणजे, २०२४ च्या आयपीएलच्या हंगामातील अंतिम सामन्यात सनराइजर्स हैदराबादने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय त्यांच्या विरोधात गेला. केकेआरने आठ विकेट राखून हैदराबादचा पराभव केला होता. यंदा श्रेयस अय्यर पंजाब किंग्जचा कर्णधार असून त्याने टॉस जिंकलेला आहे. त्यामुळे पुढच्या काही तासातच त्याच्या या निर्णयाचा निकाल आपल्याला पाहता येईल.

२०२३ साली टॉस जिंकलेल्या चेन्नईच्या संघाने गुजरात टायटन्सला पराभूत केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मौल्यवान टी२० सामना

दरम्यान आज होत असलेला आयपीएलचा अंतिम सामना वर्षातील सर्वाधिक पाहिलेल्या क्रिकेट सामन्यांपैकी एक ठरणार असला तरी, हा सामना क्रिकेट इतिहासातील सर्वात मौल्यवान सामना होण्याच्या मार्गावर आहे. कारण आजच्या सामन्यातून अंदाजे १८५ कोटी रुपयांची उलाढल होण्याची शक्यता आहे.