दिल्लीविरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात सनराईजर्स हैदराबादची झुंज अपयशी ठरली. अंतिम फेरीत दिल्लीचा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. हैदराबादकडून केन विल्यमसनने धडाकेबाज अर्धशतकी खेळी करत चांगली लढत दिली. परंतू दिल्लीच्या माऱ्यासमोर त्याचीही डाळ शिजू शकली नाही. सामना संपल्यानंतर केन विल्यमसनने आपला संघ अंतिम फेरीत पोहचू शकला नाही ही शरमेची गोष्ट असल्याचं म्हटलं आहे.

अवश्य वाचा – BLOG : अजातशत्रूंची झुंज संपुष्टात

“दिल्लीचा संघ चांगला आहे. ते देखील फॉर्मात येण्याचा प्रयत्न करत होते. आमच्याविरोधात त्यांनी खूप चांगला खेळ केला. दुसऱ्या डावात धावसंख्येचा पाठलाग करताना रिस्क घेणं गरजेचं होतं. आमची सुरुवात चांगली झाली नाही परंतू मधल्या फळीत आम्ही काही चांगल्या भागीदाऱ्या केल्या. आम्हाला विजयाची थोडीशी संधी होती, पण आम्ही अंतिम फेरीपर्यंत पोहचू शकलो नाही ही खरंच शरमेची गोष्ट आहे. पण गेल्या ३ आठवड्यांमध्ये आम्ही ज्या पद्धतीने खेळ केलाय त्याचा आम्हाला अभिमान आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केन विल्यमसनने दिल्लीविरुद्ध ६७ धावांची खेळी केली. मात्र कगिसो रबाडाने एकाच षटकात लागोपाठ विकेट घेत हैदराबादच्या शेपटाला फारशी वळवळ करण्याची संधीच दिली नाही. आयपीएलच्या इतिहासात अंतिम फेरी गाठण्याची दिल्लीची ही पहिलीच वेळ होती.