Virat Kohli out or not out : आयपीएल २०२४ मधील ३६वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळला गेला. या श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यात केकेआरने शेवटच्या चेडूंवर आरसीबीवर एका धावेने मात करत रोमहर्षक विजय नोंदवला. या सामन्यात आरसीबीला शेवटच्या चेंडूवर तीन धावांची गरज होती आणि लॉकी फर्ग्युसन स्ट्राइकवर होता. त्याने शेवटच्या चेंडूवर चांगला शॉट मारला पण दुसरी धाव पूर्ण करताना तो धावबाद झाला. अशाप्रकारे या रोमांचक सामन्यात केकेआरने आरसीबीचा एका धावेने पराभव केला. दरम्यान सामन्यात विराटला आऊट दिल्यानंतर गोंधळ झाला होता. तो काय होता जाणून घेऊया.

विराटने अंपायरशी वाद का घातला?

२२३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात जबरदस्त झाली होती. कारण विराटने फलंदाजीला येताच गोलंदाजांवर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली होती. त्याने अवघ्या ६ चेंडूत २ षटकार आणि १ चौकाराच्या मदतीने १८ धावा केल्या होत्या. तिसऱ्या षटकांत चेंडू हर्षित राणाच्या हातात होता, त्याने त्याच्या षटकातील पहिलाच चेंडू कोहलीला फुल टॉस टाकला. कोहलीने क्रीजमधून बाहेर येत राणाच्या फुल टॉस बॉलला मारण्याचा प्रयत्न केला. त्याने तो शॉट सरळ बॅटने खेळला आणि चेंडू उंच गेला आणि हर्षित राणाने त्याचा झेल घेतला. यावर अंपायरने त्याला आऊट घोषित केले. यानंतर विराटने अंपायरशी वाद घातला. कारण त्याचे म्हणणे होते की चेंडू कंबरेच्या वर होता. त्यामुळे त्याला नॉट आऊट द्यायला हवे होते.

विराट कोहलीला का आऊट दिले?

त्यानंतर विराटने नो बॉल तपासण्यासाठी रिव्ह्यू घेतला. थर्ड अंपायरने दाखवलेल्या रिव्ह्यूमध्ये चेंडू कंबरेच्या वर असल्याचे दिसले, तरीही निर्णय विराटच्या विरोधात देण्यात आला. यानंतर कोहली चांगलाच संतापलेला दिसला, ज्यामुळे अंपायर आणि कोहली यांच्यात शाब्दिक युद्धही पाहायला मिळाले. थर्ड अंपायरचा म्हणणे होते की विराट कोहली क्रीजच्या बाहेर होता, त्यामुळे नो बॉलऐवजी तो योग्य चेंडू होता. त्यांच्या मते विराट क्रीजच्या आत असता तर चेंडू नियमानुसार त्याच्या कंबरेच्या खाली असता. थर्ड अंपायरच्या निर्णयानंतर विराट कोहली संतापला. यादरम्यान तो मैदानावरील अंपायरशी वाद घालतानाही दिसला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहतेही आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. मात्र विराट कोहलीच्या या वर्तनासाठी त्यासा दंडही ठोठावला जाऊ शकतो.

हेही वाचा – KKR vs RCB : रोमहर्षक सामन्यात केकेआरचा आरसीबीवर एका धावेने निसटता विजय, विल जॅक्सची अर्धशतकी खेळी ठरली व्यर्थ

शेवटच्या षटकात विजयासाठी २१ धावांची गरज होती –

आरसीबीला शेवटच्या षटकात विजयासाठी २१ धावांची गरज होती आणि आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क गोलंदाजीसाठी आला. स्टार्कच्या पुढे कर्ण शर्माने तीन षटकार ठोकले. यानंतर आरसीबीला दोन चेंडूत तीन धावा हव्या होत्या, पण स्टार्कने कर्णला त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले. आरसीबीला शेवटच्या चेंडूवर तीन धावांची गरज होती आणि लॉकी फर्ग्युसन स्ट्राइकवर होता. त्याने शेवटच्या चेंडूवर चांगला शॉट मारला पण दुसरी धाव पूर्ण करताना तो धावबाद झाला. अशाप्रकारे या रोमांचक सामन्यात केकेआरने आरसीबीचा एका धावेने पराभव केला.