Rishabh Pant Century in IPL 2025 LSG Owner Sanjiv Goenka Reacts : इंडियन प्रीमियर लीग २०२५ पूर्वी झालेल्या महालिलावात लखनौ सुपरजायंट्सने यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला २७ कोटी रुपयांमध्ये करारबद्ध केलं होतं. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. मात्र, स्पर्धेत ऋषभ त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करू शकला नव्हता. स्पर्धेतील पहिल्या १३ सामन्यांपैकी चेन्नईवगळता इतर सर्व सामन्यांमध्ये ऋषभची बॅट शांत होती. मात्र, संपूर्ण स्पर्धेत धावांचा दुष्काळ पडलेला असताना पंतने अखेरच्या सामन्यात शतक झळकावलं.आरसीबीसाठी महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात ऋषभ पंतने मोठी खेळी करत बंगळुरूसाठी मोठी डोकेदुखी निर्माण केली होती.

ऋषभ पंतने या सामन्यात शानदार दमदार शतक झळकावलं. त्याच्या या शतकी खेळीमुळे लखनौच्या संघाने २० षटकांत २२६ धावा केल्या. ऋषभ शेवटपर्यंत नाबाद राहत त्याने ६१ चेंडूत ११ चौकार आणि ८ षटकारांसह १९३ च्या धावगतीने ११८ धावांची धुव्वाधार खेळी केली. त्यानंतर त्याने कार्टव्हील सेलिब्रेशन केलं. मात्र, या सामन्यात आणखी एका गोष्टीने लक्ष वेधलं ते म्हणजे लखनौचे संघ मालक यावेळी मैदानात नव्हते. लखनौ सुपरजायंट्स या संघाचे मालक संजीव गोएंका हे प्रत्येक सामन्यात आपल्या संघाला चिअर करण्यासाठी हजर असतात. मात्र, मंगळवारच्या सामन्यावेळी ते अनुपस्थित होते.

संजीव गोएंकांची एका शब्दात प्रतिक्रिया

संजीव गोएंका यांनी सामना संपल्यानंतर कर्णधार ऋषभ पंतचं अभिनंदन केलं. त्यांनी एका शब्दांत ऋषभ पंतच्या खेळीवर प्रतिक्रिया दिली. ऋषभचा फोटो शेअर करत त्यांनी ‘Pant’astic! अशा शब्दांत त्याचं कौतुक केलं. मात्र, लखनौच्या चाहत्यांनी मात्र गोएंका यांना चिमटा काढला आहे. “तुम्ही या सामन्यावेळी मैदानात हजर नव्हता म्हणूनच ऋषभ व लखनौच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली”, असा काहींचा सूर होता. तर काही चाहत्यांनी गोएंका यांच्या पोस्टवर कमेंट करत त्यांचे आभार मानले आहेत. “सामन्यावेळी मैदानात गैरहजर होतात त्याबद्दल तुमचे आभार”, अशा अर्थाच्या प्रतिक्रिया काही चाहत्यांनी केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऋषभची धडाकेबाज खेळी

ऋषभ पंतला आयपीएल २०२५ मधील त्याच्या कामगिरीवरून खूप ट्रोल केलं जात होतं. यापूर्वी १२ डावांमध्ये फक्त १५१ धावा करणाऱ्या पंतची सरासरी १३.७३ आणि स्ट्राईक रेट १०७.०९ चा होता. मुख्य म्हणजे स्पर्धेतील महागडा खेळाडू म्हणून त्याच्या कामगिरीबाबत सर्वांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, अखेरच्या सामन्यात दमदार शतक झळकावून त्याने सगळ्यांची तोंडं बंद केली आहे.