तब्बल ७२ वर्षांनी महाराष्ट्राचा संघ रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुंबईसारख्या बलाढय़ संघाला त्यांच्याच मातीत धुळ चारून पोहोचला होता. पण महाराष्ट्राचा विजेतेपदाचा दुष्काळ काही संपेना, हेच सामन्याच्या सरते शेवटी म्हणण्याची वेळ आली. फलंदाजी, गोलंदाजी क्षेत्ररक्षण या तिन्ही आघडय़ांवर निर्विवाद वर्चस्व राखत रविवारी रणजी करंडकावर कर्नाटकने सातव्यांदा आपली मोहोर उमटवली. सामन्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच कर्नाटकचे सामन्यावर वर्चस्व होते आणि तेच विजेतेपदाला गवसणी घालणार याबाबत कोणासही शंका वाटत नव्हती, मात्र विजयासाठी त्यांना १५७ धावांचे ध्येय साकारतानाही महाराष्ट्राविरुद्ध झगडायला लागले. त्यांनी ४०.५ षटकांत तीन गडय़ांच्या मोबदल्यात विजय मिळविला व पंधरा वर्षांनंतर अजिंक्यपद पटकाविले.
कर्नाटकने यापूर्वी १९७३-७४, १९७७-७८, १९९५-९६, १९९७-९८, १९९८-९९ मध्ये अजिंक्यपद मिळविले होते. १९९८-९९ मध्ये त्यांनी मध्यप्रदेशला पराभूत करत विजेतेपद पटकाविले होते. २००९-१० मध्ये त्यांना म्हैसूूर येथे अंतिम लढतीत मुंबईकडून पराभव स्वीकारावा लागला होता. कर्नाटकला येथे विजेतेपदाबरोबरच दोन कोटी रुपयांची कमाई झाली तर महाराष्ट्राला एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. महाराष्ट्राने २१ वर्षांपूर्वी या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती.
महाराष्ट्राने ६ बाद २७२ धावांवर दुसरा डाव पुढे सुरू केला. त्या वेळी ते कर्नाटकपुढे आणखी किती धावांचे लक्ष्य ठेवणार याचेच औत्सुक्य होते. आणखी २३.२ षटकांमध्ये त्यांनी चार बळींच्या मोबदल्यात ९४ धावांची भर घातली. त्यामध्ये श्रीकांत मुंढे याच्या ४२ धावांचा मोठा वाटा होता. अनुपम सकलेचा याने पहिल्या सत्रात विनयकुमारला उत्तुंग षटकार ठोकून पहिल्या सत्रातील कंटाळवाण्या खेळात रंग भरण्याचा प्रयत्न केला. कर्नाटकच्या विनयकुमार व श्रेयस गोपाळ यांनी प्रत्येकी चार बळी घेतले. कर्नाटकच्या चिदंबरम गौतम याने यष्टीमागे ४३ बळी मिळवित या मोसमात यष्टीमागे सर्वाधिक बळी घेण्याची किमया केली.
कर्नाटकने पहिल्या डावातील आघाडीवर विजेतेपद यापूर्वीच निश्चित केले होते, मात्र शेवटच्या दिवशी ते निर्णायक विजय मिळविणार की नाही याबाबत कुतुहल निर्माण झाले होते. महाराष्ट्राने दुसऱ्या डावात ३६६ धावा करीत कर्नाटकपुढे १५७ धावांचे लक्ष्य ठेवले.
हे लक्ष्य आवाक्यात असूनही कर्नाटकच्या फलंदाजांना महाराष्ट्राच्या गोलंदाजांविरुद्ध आत्मविश्वासाने सामोरे जाताना झुंज द्यावी लागली. त्यांनी रॉबिन उथप्पा (३६), लोकेश राहुल (२९) व अमित वर्मा (३८) यांच्या विकेट्स गमावत हा विजयाची औपचारिकता पूर्ण केली. उथप्पा व राहुल यांनी सलामीसाठी ६५ धावा करीत विजयाचा पाया रचला. अर्थात विजयासाठी कर्नाटकला चहापानापर्यंत वाट पहावी लागली. मनीष पांडे (नाबाद २८) व करुण नायर (नाबाद २०) यांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. शेवटच्या दिवशीही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी कौतुकास्पद झुंज देत आपले मनोधैर्य टिकविले होते.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र पहिला डाव : ३०५.
कर्नाटक पहिला डाव : ५१५.
महाराष्ट्र दुसरा डाव : ९१.२ षटकांत सर्वबाद ३६६ (केदार जाधव ११२, अंकित बावणे ६१; विनयकुमार ४/११६, श्रेयस गोपाळ ४/४७).
कर्नाटक दुसरा डाव : ४०.५ षटकांत ३ बाद १५७ (रॉबिन उथप्पा ३६, मनीष पांडे नाबाद २८, करुण नायर नाबाद २०, अक्षय दरेकर १/४६, श्रीकांत मुंढे १/२०).
कर्नाटकच्या खेळाडूंचे अशोभनीय वर्तन!
महाराष्ट्राच्या फलंदाजीच्या वेळी कर्नाटकचे रॉबिन उथप्पा, यष्टीरक्षक चिदम्बरम गौतम यांच्यासह अनेक खेळाडू सातत्याने फलंदाजांवर शेरेबाजी करीत होते. त्याबद्दल महाराष्ट्राच्या फलंदाजांना पंचांकडे तक्रारही करावी लागली. खरंतर कर्नाटकच्या खेळाडूंना असे कृत्य करण्याची काहीही आवश्यकता नव्हती. मात्र विजेतेपदाचा फाजील गर्व त्यांच्या देहबोलीत सातत्याने दिसत होता. पंचांकडून समज मिळेपर्यंत त्यांची शेरेबाजी सुरू होती.
आम्ही क्षेत्ररक्षणात कमी पडलो. जर आम्ही कर्नाटकला पहिल्या डावात चारशे धावांत रोखले असते, तर सामना अधिक रंगतदार झाला असता. मात्र संघाच्या कामगिरीबाबत मी समाधानी आहे. संघात अनेक युवा खेळाडूंचा समावेश आहे व त्यांना उज्ज्वल भवितव्य आहे. येथे आम्ही अनुभवी कर्नाटकला शेवटपर्यंत चांगली लढत देऊ शकलो याचाच मला आनंद वाटत आहे.
सुरेंद्र भावे, महाराष्ट्राचे प्रशिक्षक
संग्रहित लेख, दिनांक 3rd Feb 2014 रोजी प्रकाशित
महाराष्ट्राचा दुष्काळ संपेना!
तब्बल ७२ वर्षांनी महाराष्ट्राचा संघ रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुंबईसारख्या बलाढय़ संघाला त्यांच्याच मातीत धुळ चारून पोहोचला होता.
First published on: 03-02-2014 at 02:55 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka outclass maharashtra in ranji trophy to lift 7th title