क्रिकेटकडे एक संधी मागणाऱ्या करूण नायरने इंग्लंडच्या भूमीवर द्विशतक झळकावलं आहे. भारताच्या सिनियर संघाच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारताचा अं संघ इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. ज्याचे नेतृत्त्व अभिमन्यू ईश्वरन करत आहे. भारत अ संघ ४ दिवसीय दोन सामने खेळणार आहे. यातील पहिला सामना ३० जूनपासून सुरू झाला आहे. सुरूवातीचे २ विकेट्स गमावल्यानंतर भारताच्या अं संघाने कमालीचं प्रत्युत्तर देत फलंदाजी केली आहे.
करूण नायर इंग्लंड लायन्सविरूद्ध पहिल्याच सामन्यात पहिल्या दिवशी आपलं शानदार शतक पूर्ण केलं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी दणदणीत चौकारासह द्विशतक झकळकावलं. करूण नायरने २७२ चेंडूत तब्बल २६ चौकार आणि एका षटकारासह २०३ धावांचा टप्पा गाठला. करूण नायरने आपली तंत्रशुद्ध फलंदाजी आणि एका टोकाला घट्ट पाय रोवून उभा राहत भारताच्या धावांमध्ये मोठी भर घातली. करूणच्या शतकासह भारताने आतापर्यंत १०१ षटकांत ५ बाद ४५४ धावा केल्या आहेत. भारताच्या सिनियर संघाच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी करूण नायरचं शतक हे टीम इंडियासाठी चांगली गोष्ट असेल. रोहित-विराटच्या निवृत्तीवर संघात अनुभवी खेळाडू म्हणून करूण नायरची निवड करण्यात आली आहे.
इंग्लंड लायन्स संघाने सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारत अ संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ३ बाद ४०९ धावा फलकावर जोडल्या होत्या. यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार अभिमन्यू ईश्वरन यांची जोडी सलामीला उतरली. अभिमन्यू २ चौकारांसह ८ धावा करत बाद झाला. तर यशस्वी जैस्वाल ३ चौकार आणि एका षटकारासह २४ धावा करत माघारी परतला. यानंतर भारताच्या सिनियर संघात निवड न झाल्याने चर्चेत असलेल्या सर्फराझ खानने आपल्या बॅटने निवडकर्त्यांना उत्तर दिलं.
सर्फराझने ११९ चेंडूत १३ चौकारांसह ९२ धावांची उत्कृष्ट खेळी केली आणि करूण नायरबरोबर महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. यानंतर ध्रुव जुरेलने १२० चेंडूत ११ चौकार आणि एका षटकारासह ९४ धावा केल्या. या दोन्ही खेळाडूंचं शतक अवघ्या काही धावांच्या फरकामुळे हुकलं. तर नितीश रेड्डी ७ धावा करत बाद झाला. करूण नायरच्या शतकामुळे आता भारताच्या सिनियर संघात विराट कोहलीच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीकरता त्याचीच निवड होईल, अशी खेळी त्याने केली आहे.
जवळजवळ ८ वर्षांपासून टीम इंडियाबाहेर असलेला अनुभवी फलंदाज करुण नायर गेल्या एका वर्षात खोऱ्याने धावा केल्या आहेत. रणजी ट्रॉफीपासून विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीपर्यंत, त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पाहायला मिळाला. यादरम्यान करुण नायरने एकूण ९ शतकं झळकावली. करूणच्या शतकांचा सिलसिला भारतीय संघ कसोटीमध्ये झगडताना सुरू होता. तेव्हा भारताने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिका गमावली होती आणि त्याला संघात घेण्याची मागणी होत होती.
अखेर, २०१७ नंतर पहिल्यांदाच करुण नायरची कसोटी संघात निवड झाली. पण कसोटी मालिकेपूर्वी, इंडिया अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यातील सामन्याच्या पहिल्या दिवशी करुण नायरने एक संस्मरणीय शतक झळकावले. करुणने तिसऱ्या क्रमांकावर खेळताना एक उत्कृष्ट खेळी केली, ज्याने खराब सुरुवातीनंतर इंडिया-अ संघाचा डाव सावरला.
सहाव्या षटकात पहिली विकेट पडल्यानंतर फलंदाजीला आलेल्या करुणने चौथ्या क्रमांकाचा फलंदाज सर्फराझ खानसह १८१ धावांची भागीदारी करून भारत अ संघाला पहिल्या दिवशी मजबूत स्थितीत आणले.