राष्ट्रीय खेळाडू चंदू चावरेपुढे आर्थिक संकट

चंदू सखाराम चावरे. नाशिक जिल्ह्यतील सुरगाणा या आदिवासी दुर्गम तालुक्यातील एक नाव. क्रीडाप्रेमी आणि त्यातही खो-खोप्रेमी जे असतील ते वगळता हे नाव इतरांना माहीत असणे तसे कठीणच. अलीकडेच नाशिक येथे झालेल्या राष्ट्रीय उपकनिष्ठ खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या आणि त्याबद्दल खो-खो प्रेमी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून गौरवान्वित झालेल्या चंदूची या क्षेत्रात भविष्यातील वाट आर्थिक परिस्थितीअभावी बिकट झाली आहे. खो-खोमध्ये आर्थिक भवितव्य असेल तरच चंदूने पुढे खेळावे अन्यथा शिक्षणाकडेच लक्ष द्यावे, अशी भूमिका त्याच्या पालकांनी मांडली आहे.

नाशिक येथील राष्ट्रीय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेल्या चंदूच्या खेळाने शरद पवारही चांगलेच प्रभावित झाले होते. मागील वर्षीही जूनच्या पूर्वार्धात भुवनेश्वर येथे झालेल्या १४ वर्षांखालील २७व्या उपकनिष्ठ राष्ट्रीय खो-खो स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या महाराष्ट्राच्या संघाचा चंदू हा कर्णधार होता. कोणत्याही खेळात इतक्या लहान वयात महाराष्ट्राचे कर्णधारपद भूषवण्यास मिळणे, हीच मोठी गौरवशाली बाब. शहरी भागाशी अजिबात संबंध नसलेल्या मुलाने भाषिक अडचणीवर मात करीत हे पद यशस्वीपणे सांभाळणे हे त्यापेक्षाही अधिक महत्त्वपूर्ण. खो-खोमध्ये नाशिकच्या वाटय़ाला असे यश प्रथमच आले. त्याच कामगिरीची पुनरावृत्ती चंदूने नाशिकच्या स्पर्धेत केली. खो-खो नसानसांत भिनलेल्या चंदूला भविष्याची अधिक चिंता आहे. खो-खो पासून आपण दुरावणार तर नाही ना, अशी भीती त्याला वाटत आहे.

खो-खोच्या मैदानावर आक्रमण आणि संरक्षण या दोन्ही बाजू समर्थपणे सांभाळणाऱ्या चंदूपुढे कमकुवत आर्थिक परिस्थितीच्या आक्रमणापासून आपल्यातील खो-खोपटूचे कसे संरक्षण करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुरगाणा तालुक्यातील डोंगर-दऱ्यांमध्ये आणि ज्या ठिकाणी अद्यापही राज्य परिवहनची बस जात नाही, शासकीय असो वा खासगी  कोणत्याही दूरसंचार कंपनीचे जाळे नाही. अशा खोबाळा दिगर या छोटय़ाशा गावात चंदू राहतो. आई-वडील, दोन भाऊ, दोन बहिणी असे त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य. सध्या सुरगाणा तालुक्यातीलच अलंगुण येथील अनुदानित माध्यमिक आश्रमशाळेत इयत्ता आठवीत शिकत असलेल्या चंदूने खूप शिकावे ही त्याच्या आई-वडिलांची इच्छा. त्याचा मोठा भाऊ सुरेश पाचवीपर्यंत शिकल्यावर घरकाम आणि शेतीकामासाठी त्याला पुढील शिक्षण बंद करावे लागले. ती वेळ चंदूवर येऊ नये म्हणून त्याचे आई-वडील काळजी घेत आहेत. चंदू कोणत्या स्पर्धेत खेळतो, त्याचे कोण कौतुक करतो याविषयी त्याच्या आई-वडिलांना काहीही घेणे नाही. चंदू चांगला खेळतो म्हटल्यावर त्याचे कौतुक होणारच, असे त्यांचे रोखठोक म्हणणे. खो-खो खेळून जर चंदूला पैसा मिळणार असेल, तर त्याने खेळत राहावे अन्यथा शिक्षणाकडेच लक्ष द्यावे, अशी त्यांची भूमिका आहे.

चंदू एकदा का खोबाळ्याला आला की पुन्हा नाशिकला येण्यासाठी त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. गावापासून एखाद्या खासगी जीपने १८ किलोमीटरवरील बाऱ्हे हे गाव गाठावे लागते. बाऱ्हे येथून नाशिककडे येण्यासाठी बसने प्रवास करावा लागतो. म्हणजेच त्याला एका बाजुने किमान दोनशे रुपये तरी प्रवासाचे लागतात. शहरी माणसांना दोनशे रुपये विशेष वाटणार नाहीत. परंतु, त्याची किंमत खोबाळ्यासारख्या ठिकाणी राहिल्यावर किती तरी अधिक असल्याचे लक्षात येते. खोबाळ्यापासून चंदू शिकत असलेली अलंगुणची आश्रमशाळा ८० किलोमीटरवर आहे. चंदू जर खोबाळ्याला असेल, तर जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना त्याच्याशी संपर्क साधणे कठीण होते. चंदूला जर पदाधिकाऱ्यांना एखादा निरोप द्यावयाचा असेल, तर गावाजवळील डोंगरावर चढाई करावी लागते. कारण त्यानंतरच दूरध्वनीचा संपर्क होऊ शकतो. स्थानिक शिक्षकांव्यतिरिक्त जिल्हा संघटनेचे सरचिटणीस मंदार देशमुख, उमेश आटवणे यांच्यासारख्यांकडून सातत्याने होणारी देखरेख आणि मार्गदर्शन चंदूला राष्ट्रीय स्तरापर्यंत घेऊन आली असली तरी यापुढे केवळ आर्थिक परिस्थितीअभावी महाराष्ट्र एका चांगल्या खो-खोपटूपासून दुरावू नये यासाठी सर्वानी अशा खेळाडूमागे उभे राहण्याची गरज आहे.