आयपीएल २०२१च्या ४१व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) आणि दिल्ली कॅपिटल्स (डीसी) आज आमनेसामने आले आहेत. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सला केकेआरला हरवण्याची गरज आहे. केकेआरचा कर्णधार इऑन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत दिल्लीला १२७ धावांवर रोखले. दिल्लीला जिंकण्यासाठी १२० चेंडूत १२८ धावांची आवश्यकता आहे.

सामन्यादरम्यान, २०व्या षटकात आर. अश्विन टिम साऊदीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर साऊदी आणि अश्विनमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. शाब्दिक चकमकीनंतर कोलकात्याचा कर्णधार ईऑन मॉर्गनही मध्ये पडला, केकेआरच्या खेळाडूंनी हा वाद मिटवत अश्विनला मॉर्गनपासून दूर केले. धाव घेताना साऊदी खेळपट्टीच्या मध्ये येत होता, हे अश्विनच्या रागाचे कारण असल्याचे समोर येत आहे. अश्विने ८ चेंडूत ९ धावा केल्या.

नेमकं काय घडलं?

दिल्ली कॅपिटल्सच्या डावाच्या शेवटच्या षटकात ही घटना घडली. हे षटक टीम साऊदीने टाकले. सौदीने संथ चेंडू टाकला. यावर अश्विन क्रीजच्या बाहेर आला आणि त्याने पुल शॉट खेळला. चेंडू हवेत गेला आणि डीप स्क्वेअर लेगवर उभ्या असलेल्या नितीश राणाने झेल घेतला. दरम्यान, धावा घेताना सौदीने अश्विनला काहीतरी म्हटले. अश्विन हे पाहून चिडलेला दिसला आणि त्यानेही मागे वळून त्याला उत्तर दिले. तोपर्यंत केकेआरचा कर्णधार मॉर्गनही तिथे आला तोही अश्विनशी भिडला. अशा स्थितीत पंच, कार्तिक आणि पंत यांनी वातावरण शांत केले. नंतर अश्विन पॅव्हेलियनमध्ये परतला.