संघ प्रशिक्षक, व्यवस्थापकांची व्यथा खो-खो हा ग्रामीण खेळ असला तरी त्यात वेग आणि थरारकता आहे. जम्मू-काश्मीरमध्ये खो-खो रुजवण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न होत असले तरी काश्मीरमधील अशांततेमुळे त्यात अपेक्षित यश आलेले नाही. ज्यांना काश्मीरमध्ये शांतता नको आहे, अशा मंडळींच्या कारवायांमुळे पर्यटनावर आधारित व्यवस्था ठप्प तर झालीच, शिवाय क्रीडा विकासावरही मर्यादा आल्या आहेत. नाशिक येथील छत्रपती स्टेडियममध्ये आयोजित २८व्या उपकनिष्ठ राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सहभागी झालेल्या जम्मू-काश्मीर खो-खो संघाचे प्रशिक्षक धीरज शर्मा आणि व्यवस्थापक महेदूर मलिक यांनी ही व्यथा मांडली. जम्मू-काश्मीरमधील खो-खो, विकासासाठी होणारे प्रयत्न आणि काश्मीरमधील घडामोडींचा होणारा परिणाम याविषयी माहिती दिली. ‘‘भारताचा तिरंगा डौलाने फडकवण्याची आमचीही इच्छा आहे. जम्मू-काश्मीरमध्ये खो-खोचा प्रसार करण्यासाठी आम्हीही उत्सुक आहोत, परंतु काश्मीरमधील बिघडलेले वातावरण पाहता त्या ठिकाणी सध्यातरी हे शक्य नाही. त्यामुळे जम्मूवरच आम्हाला सर्व लक्ष केंद्रित करावे लागत असून या स्पर्धेसाठी आलेल्या संघातील सर्व खेळाडू हे जम्मूमधील आहेत,’’ असे महेदरू मलिक यांनी नमूद केले. ‘‘खो-खोविषयी पालकांना विशेष माहिती नसल्याने त्यांचे प्रबोधन करण्याचे कामही आम्हाला करावे लागते. जम्मूमध्ये खो-खोच्या प्रसारासाठी राज्य संघटनेकडून धोरण ठरवण्यात येत आहे. या राज्यातील खो-खो जम्मूपुरताच मर्यादित आहे. काश्मीरमधून पाच-सहा चांगले खेळाडू मिळाल्यास जम्मू-काश्मीरचा संघ खऱ्या अर्थाने तयार होईल. जम्मूमधील बहुतांश शाळांमध्ये खेळाच्या तासाला खो-खो शिकवला जातो. जिल्हास्तरीय स्पर्धामध्ये १० ते १२ संघांचा सहभाग असतोच. अशा प्रकारे हळूहळू एक दिवस भारताच्या खो-खो संघात जम्मू-काश्मीरचा एक तरी चेहरा दिसावा या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे,’’ असे मलिक यांनी सांगितले. ‘‘जम्मूपेक्षा काश्मीरमधील परिस्थिती अधिक चिंतादायक आहे. शाळेत गेलेला मुलगा घरी सुखरूप परतणार की नाही याची पालकांना चिंता असते. त्यामुळे त्यांना मैदानावर पाठवणे तर त्यांच्याकडून या परिस्थितीत शक्यच नाही,’’ असे मत प्रशिक्षक धीरज शर्मा यांनी मांडले. यावेळी इयत्ता आठवीतील दिशांत गुलेरिया आणि अमीत चंदेर या खेळाडूंनी जम्मूपासून नाशिकपर्यंत प्रवास करताना आपण एक वेगळा देश पाहत असल्याचा अनुभव आल्याची प्रतिक्रिया नोंदविली. खो-खो यापुढेही खेळणार असल्याचा निर्धार व्यक्त करीत नाशिकमध्ये मिळालेल्या प्रेमळ वागणुकीचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.