तब्बल ८ वर्ष कोणत्याही प्रकारचे आंतराष्ट्रीय क्रिकेट सामने न खेळवलेल्या पाकिस्तानने आपल्या देशात पुन्हा एकदा क्रिकेट खेळवण्यासाठी पावलं टाकायला सुरुवात केली आहे. 3 मार्च २००९ साली पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या श्रीलंकेच्या संघावर अतिरेकी हल्ला झाला होता. गदाफी मैदानात जाणाऱ्या श्रीलंकन संघाच्या बसवर लष्कर-ए-जहांगवीच्या १२ अतिरेक्यांनी गोळीबार केला होता.

या हल्ल्यात श्रीलंकेच्या संघातील ६ सदस्य हे जखमी झाले होते तर ६ पाकिस्तानी पोलिसांसोबत २ नागरिकांचाही मृत्यू झाला होता. यानंतर आयसीसीने पाकिस्तानवर कोणत्याही प्रकारचे क्रिकेट सामने खेळण्यावर बंदी घातली होती. यानंतर पाकिस्तानी संघासाठी त्यांच्या घरचे सामने हे दुबईच्या मैदानात खेळवले जायचे.

मात्र तब्बल ८ वर्षांनी आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी पाकिस्तानात पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्यास आपली सहमती दर्शवली आहे. सप्टेंबर महिन्यात ‘जागतिक ११’ संघाचा पाकिस्तान दौरा नियोजीत आहे. या सामन्याला आयसीसीनेही आपली मान्यता दर्शवली आहे. याचकारणासाठी पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे सध्याचे अध्यक्ष शहरयार खान यांनी मनोहर यांना लाहोरमध्ये पुढच्या महिन्यात आपल्या निवृत्तीच्या कार्यक्रमात जेवणाचं निमंत्रण दिलं आहे.

लंडन येथे आयसीसीच्या बैठकीत शहरयार खान यांनी मनोहर यांना लाहोरमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं. ज्याला मनोहर यांनी तत्वत: होकार कळवला असला तरीही ते लाहोरला जातील हे निश्चीत नाहीये. ‘जागतिक 11’ संघाचा पाकिस्तान दौरा हा पाकिस्तानमधल्या क्रिकेटसाठी एक नांदी ठरु शकतो. त्यामुळे मनोहर यांना शहरयार खान यांच्या निवृत्ती सोहळ्यात बोलवण्याकडे आमचं विशेष लक्ष असल्याचं पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी म्हणलं आहे.
त्यामुळे शशांक मनोहर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं निमंत्रण स्विकारुन लाहोरला हजेरी लावतात का आणि सप्टेंबरमध्ये पाकिस्तानमध्ये पुन्हा क्रिकेटला सुरुवात होते का याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं असेल.