Rishabh Pant after LSG vs RCB IPL Match: आयपीएलच्या यंदाच्या हंगामात लखनौ सुपर जाएंट्सनं ऋषभ पंतला तब्बल २७ कोटी रुपये देऊन खरेदी केलं. पण संपूर्ण IPL मध्ये ऋषभ पंतला आपल्या लौकिकाला साजेशी खेळी साकारता आली नाही. पण अखेरच्या सामन्यात ऋषभ पंतनं वादळी शतक साकारत आपल्या चाहत्यांना तुफान फटकेबाजीची भेट दिली आणि आयपीएलचा शेवट गोड केला. लखनौ सुपर जाएंट्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव पत्करावा लागला असला, तरी सोशल मीडियावर चर्चा मात्र ऋषभ पंतच्या अविस्मरणीय खेळीची चालू आहे. या खेळीनंतर ऋषभ पंतने दिलेली सूचक प्रतिक्रिया आता चर्चेचा विषय ठरली आहे.
ऋषभ पंतचं वादळी शतक
ऋषभ पंतनं RCB विरुद्धच्या सामन्यात अवघ्या ५२ चेंडूंमध्ये शतक साजरं केलं. आत्तापर्यंतच्या आयपीएलमध्ये ऋषभ पंतचं हे केवळ दुसरं शतक आहे. पण यंदाच्या हंगामातल्या शेवटच्या सामन्यात हे शतक झळकावताना पंतनं तब्ब ११ चौकार आणि ८ उत्तुंग षटकार लगावत आरसीबीच्या गोलंदाजीच्या अक्षरश: चिंधड्या उडवल्या. शिवाय लखनौच्या मैदानावर आयपीएल स्पर्धेदरम्यान शतक झळकावणारा ऋषभ पंत हा पहिला खेळाडू ठरला.
यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वात महागडा खेळाडू (२७ कोटी)आणि खराब फॉर्म या गोष्टींमुळे पंत चर्चेत राहिला होता. त्यानं या खेळीतून टीकाकारांना उत्तर दिल्याचं बोललं जात आहे.
काय म्हणाला ऋषभ पंत?
ऋषभ पंतनं सामन्यानंतर आपल्या वादळी खेळीबाबत प्रतिक्रिया दिली. “आयपीएलमध्ये प्रत्येक सामन्यागणिक मला अधिकाधिक फिट वाटत होतं. चांगली खेळी होईल असंही वाटत होतं. पण कधीकधी तुम्हाला वाटतं तशी खेळी होत नाही. पण आज मी याची काळजी घेतली की जर मला चांगली सुरुवात मिळाली, तर मोठी खेळी साकारायची. जसं सगळे अनुभवी खेळाडू करतात. मी नेहमी सर्वोत्तम उदाहरणांतूनच शिकतो”, असं ऋषभ पंत म्हणाला.
“जेव्हा जेव्हा तुम्हाला चांगली सुरुवात मिळते, तेव्हा तुम्ही त्या संधीचं सोनं करायला हवं. मी फिल्डिंग जशी लावली जायची, त्यानुसार खेळत होतो. ही बाब मी मनाशी पक्की केली होती. मी या खेळीत प्रत्येक चेंडू त्याच गांभीर्याने खेळलो”, असं ऋषभ पंतनं नमूद केलं.
आता स्विच ऑफ!
दरम्यान, ऋषभ पंतनं इंग्लंड दौऱ्याआधी काही काळ विश्रांती घेण्याचा मानस बोलून दाखवला आहे. ऋषभ पंत हा भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा उपकर्णधार आहे. भारतीय संघ लवकर इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याआधी ऋषभ पंतला फॉर्म गवसणं भारतासाठी सकारात्मक बाब मानली जात आहे.
“आता काही दिवस मला फक्त स्विच ऑफ व्हायचं आहे. काही दिवस क्रिकेटबद्दल विचारच करायचा नाहीये. त्यानंतर इंग्लंडविरुद्धची मालिका सुरू होणार आहे. त्या मालिकेसाठी नव्या उत्साहात तयारीला लागायचं आहे”, असं ऋषभ पंत म्हणाला.
यंदाच्या IPL मधील ऋषभ पंतची कामगिरी…
यंदाच्या आयपीएलमध्ये ऋषभ पंतनं लखनौ सुपर जाएंट्सचा कर्णधार म्हणून १४ सामने खेळले. त्यात १३ वेळा तो फलंदाजीसाठी उतरला. पण त्याला फक्त २६९ धावाच करता आल्या. शेवटच्या सामन्यातील ११८ धावांची खेळी ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. यंदाच्या हंगामात त्याने एक शतक तर एक अर्धशतक झळकावलं. त्यामुळे सर्वात महागडा खेळाडू असूनही ऋषभ पंतच्या नावावर लौकिकाला साजेशी आकडेवारी जमू शकली नसल्याने त्याच्यावर टीका केली जात होती.