नवी दिल्ली : भारताची बॅडिमटनपटू सायना नेहवालने आगामी राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या निवड चाचणीतून माघार घेतली आहे. राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसाठीची निवड चाचणी १५ ते २० एप्रिलदरम्यान होणार आहे.  

राष्ट्रकुल स्पर्धेतील दोन सुवर्णपदके विजेत्या सायनाने भारतीय बॅडिमटन संघटनेला (बीएआय) पत्र लिहून आपण निवड चाचणीत सहभागी होणार नसल्याचे कळविले आहे.

‘‘सायनाने ‘बीएआय’ला पत्र लिहून आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे. राष्ट्रकुल, आशियाई क्रीडा स्पर्धा आणि उबेर चषक या स्पर्धाकरता भारतीय संघात निवडीसाठी ही एकमात्र स्पर्धा आहे,’’ असे सूत्रांकडून सांगण्यात आले.  राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय संघात १० सदस्य असतील. आशियाई क्रीडा स्पर्धा, थॉमस-उबेर चषकसाठी २० सदस्यीय भारतीय संघ निवडण्यात येईल.