भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर खांद्याच्या दुखापतीतून बरा झाला आहे आणि लवकरच तो क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्यास उत्सुक आहे. यंदाच्या २३ मार्चपासून अय्यर क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता, इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यात त्याच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. परिणामी त्याला शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले.
टीम इंडियाच्या मधल्या फळीत खेळणाऱ्या अय्यरने शस्त्रक्रियेनंतर बरे होण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. पुढच्या महिन्यात संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात तो दिल्ली कॅपिटल्सकडून आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे.
अय्यरने त्याच्या वर्तमान स्थितीबद्दल आणि फिटनेसच्या शिखरावर असताना कारकिर्दीत चुकीच्या वेळी दुखापतीचा सामना करणे किती कठीण गेले, याचा खुलासा इंडिया टुडेशी बोलताना केला आहे. तो म्हणाला, “सध्या मला चांगले वाटत आहे, प्रामाणिकपणे सांगायचे, तर हा प्रवास छान होता. दुखापतीनंतर मी थोडासा त्रासलो होतो आणि मला काय करावे हे समजत नव्हते. मी रडत ड्रेसिंग रूममध्ये गेलो आणि ते ती घटना पचवायला मला थोडा वेळ लागला.”
हेही वाचा – VIDEO : देशाचे क्रीडामंत्रीही आहेत ‘सुपरफिट’; दिग्गज मंडळींसमोर दाखवली झलक
“जेव्हा मला कळले, की मला शस्त्रक्रियेला सामोरे जायचे आहे, तेव्हा मला ती गोष्ट पचवणे खरोखर कठीण गेले. माझ्या दुखापतीपूर्वी मी ज्याप्रकारे प्रशिक्षण घेत होतो, मी सर्वोच्च स्तरावर होतो आणि अचानक ही विचित्र दुखापत झाली आणि ती कशी घडली हे मला समजले. पण हे एका खेळाडूच्या कारकिर्दीचा एक भाग आहे, म्हणून मी ते सत्य स्वीकारले. हा एक धक्का होता. या सर्व गोष्टी मागे टाकून तुम्हाला दमदार पुनरागमन करावे लागते”, असेही अय्यर म्हणाला.
श्रेयस अय्यर सध्या यूएईमध्ये आहे आणि तिथे तो सतत सराव करत आहे. दुखापतीमुळे आयपीएल २०२१च्या पहिल्या टप्प्यात त्याला भाग घेता आला नाही. त्यामुळे ऋषभ पंतने दिल्ली कॅपिटल्सची धुरा सांभाळली, पण आता अय्यरला पुन्हा कर्णधार केले जाईल का, हे संघ व्यवस्थापनाने जाहीर केलेले नाही.