दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटीतील पराभवानंतर भारताचा कर्णधार केएल राहुल खूपच निराश झाला आहे. जोहान्सबर्ग येथील मैदानावर गुरुवारी झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला सात गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या मैदानावर २९ वर्षांनंतर भारताचा कसोटी क्रिकेटमधील हा पहिला पराभव आहे. पराभवानंतर कर्णधार केएल राहुलने प्रतिक्रिया दिली. नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघाने पहिल्या डावात आणखी ६०-७० धावा करायला हव्या होत्या, असे केएल राहुललने म्हटले आहे.

संघाची कुठे चुक झाली हे राहुललने सामन्यानंतर सांगितले आहे. “नाणेफेक जिंकल्यानंतर आम्ही पहिल्या डावात मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरलो. आम्ही किमान ६०-७० धावा करायला हव्या होत्या. आम्हाला वाटले की १२२ धावा करणे सोपे नाही. आम्ही जास्त धावा करून त्यांच्यावर दबाव आणायला हवा होता. आम्ही येथे काही खास करू शकतो, असा विश्वास संघाला वाटत होता. खेळपट्टीवर फलंदाजी करणेही अवघड होते, पण दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली. शार्दुल ठाकूरसाठी हा एक उत्तम कसोटी सामना होता. त्याने आपल्या कामगिरीने आपल्याला खूप प्रभावित केले आहे. त्याने फलंदाजीतलही महत्त्वपूर्ण योगदान दिले,” असे केएल राहुलने सामन्यानंतर म्हटले आहे.

केएल राहुलकडे दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. विराट कोहलीनं पाठीच्या दुखण्यामुळे या कसोटीमधून माघार घेतली होती. भारतीय संघाने पहिला कसोटी सामना कोहलीच्या नेतृत्वाखाली जिंकला होती. त्याच्या अनुपस्थितीमध्ये राहुल पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळत होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दक्षिण आफ्रिकेने जोहान्सबर्ग कसोटीत ७ गडी राखून विजय नोंदवत तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. कर्णधार डीन एल्गरने १८८ चेंडूत १० चौकारांसह नाबाद ९६ धावा केल्याने दक्षिण आफ्रिकेने चौथ्या दिवशी २४० धावांच्या लक्ष्यासमोर वॉंडरर्स येथे भारताविरुद्ध ३ बाद २४३ धावांवर पहिला विजय नोंदवला. विराट कोहलीशिवाय खेळताना भारताने पहिल्या डावात २०२ धावा आणि दुसऱ्या डावात २६६ धावा केल्या. तर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात २२९ धावा करत २७ धावांची आघाडी घेतली. आता ११ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये दोन्ही संघांमधील तिसरी आणि अंतिम कसोटी सामना खेळवला जाणार आहे.