पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार सना मीरने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. संपूर्ण खेळभावनेने आपला पराभव स्वीकारणारा विराट कोहली आदर्श खेळाडू असल्याचं सना मीरने म्हटलं आहे. पाकिस्तानविरोधातील मानहानीकारक पराभवानंतर विराट कोहलीने मोहम्मद रिझवानची गळाभेट घेतली होती. तसंच बाबर आझमचंही अभिनंदन केलं होतं. टी-२० वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून मोठा पराभव केला. यासोबत वर्ल्डकपमध्ये भारताविरोधात विजयी न होण्याचा लाजिरवाणा विक्रमही पाकिस्तानने मोडीत काढला. सना मीरने आयसीसीच्या अधिकृत वेबसाईटवर लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे की, "विराट कोहलीने पूर्ण खेळभावनेने आपला पराभव स्वीकारला आणि त्याच्या याच गोष्टीचं मी कौतुक करते. मोठ्या खेळाडूंनी अशा पद्धतीने वर्तन करणं वास्तवात फार चांगलं आहे". विशेष म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही विराट कोहलीचा फोटो शेअर करत खेळभावनेचं कौतुक केलं होतं. सना मीरने पुढे म्हटलं आहे की, "यामुळे त्यांच्यात असणाऱ्या सुरक्षा भावनेचीही जाणीव होते. याचा अर्थ पुनरागमन करण्यासंबंधी त्यांना विश्वास आहे". भारताने एखादा मोठा विजय मिळवत पुनरामन केलं तर आपल्याला आश्चर्य वाटणार नाही असंही तिने म्हटलं आहे. "जर भारताने मोठ्या विजयासोबत पुनरागमन केलं तर मला आश्चर्य वाटणार नाही आणि मला आशा आहे की स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा एकमेकांविरोधात मैदानात खेळताना दिसतील," असं तिने म्हटलं आहे.