सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा, कांस्यपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया यांच्यासह टोक्योहून मायदेशी परतलेल्या भारतीय ऑलिम्पिक पथकाचे सोमवारी नवी दिल्लीतील विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर नवी दिल्ली येथील अशोका हॉटेलमध्ये ऑलिम्पिक पदकविजेत्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, माजी केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू, केंद्रीय राज्य क्रीडामंत्री निशित प्रामाणिक उपस्थित होते. या सोहळ्यासाठी मंचावर लावण्यात आलेलं बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकांनी या बॅनरवर पदक विजेत्यांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो अधिक मोठ्या आकाराचा लावल्याबद्दल नाराजी व्यक्त केलीय. ऑलिम्पिक पदक विजेता विजेंदर सिंगनेही यासंदर्भात नाराजी व्यक्त केलीय.

नक्की वाचा >> बॅनरवर मोदींचा मोठा फोटो लावण्यावरुन टीका करणाऱ्यांना ऑलिम्पिक पदक विजेत्याने लगावला टोला; म्हणाला…

झालं असं की पदक जिंकून आलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यासाठी नवी दिल्लीमधील हॉटेल अशोकामध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी केंद्रीय मंत्र्यांबरोबरच खेळाडूंनाही आपली मत व्यक्त केली. मात्र या कार्यक्रमासाठी मंचावर लावण्यात आलेल्या भल्या मोठ्या बॅकड्रॉपने सर्वांचेच लक्ष वेधले. मंचावरील या पोस्टवर सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक विजेत्या खेळाडूंचे फोटो होते. मात्र हे फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोच्या आकारापेक्षा फारच छोटे असल्याचं दिसत होतं. यावरुनच अनेकांनी नाराजी व्यक्त केली. ऑलिम्पिक पदक विजेता विजेंदर सिंगनेही याबद्दल ट्विट करत मोदी सरकारला टोला लगावला आहे. मंचावरील या बॅनरचा फोटो शेअर करत विजेंदरने “सर्व गोष्टी या पीआरचा भाग आहेत आणि पीआरच सर्वकाही आहे,” असा टोला लगावला आहे.

काँग्रेसच्या भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनीही ट्विटरवरुन हा फोटो शेअर करत, “पदक मोदीजींनी जिंकून आणलंय का?,” असा खोचक टोला लगावला आहे.

बी. व्ही. यांनी अन्य एका ट्विटमध्ये “खुद के चेहरे से ऐसी मोहब्बत.. न पहले कभी देखी है न सुनी है..”, अशा ओळींसहीत या कार्यक्रमामधील मंचाचा फोटो शेअर केलाय ज्यात पंतप्रधान मोदींचा चेहरा फार दुरुनही ओळखू येत असून खेळाडूंचे फोटो तुलनेने लहान आकाराचे आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल नेटवर्किंगवर अनेकांनी हे फोटो शेअर करत नाराजी व्यक्त केली असून खेळाडूंचे फोटो अजून मोठ्या आकाराचे आणि अधिक प्राधान्यक्रमाने ठेवायला हवे होते असं मत नोंदवलं आहे. दरम्यान, विजेंदर सिंगने मोदी सरकारवर अशाप्रकारे टीका करण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीय. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी क्रीडा प्रकारातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या खेलरत्न पुरस्काराला राजीव गांधी यांच्याऐवजी महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्याचा निर्णय जाहीर केला होता तेव्हाही विजेंदरने मोदी सरकारवर निशाणा साधला होता. “भाई, हे फक्त नाव बदलू शकतात, काही दिवसात भारताचे नाव देखील बदलून यूएसए करतील”, असा टोला विजेंदर सिंगने ट्विटरवरुन लगावला होता.