क्रिकेटच्या मैदानावर तुफान फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा वीरेंद्र सेहवाग क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर ट्विटरवर जोरदार टोलेबाजी करताना दिसतो आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानवर बरसल्यावर आता वीरेंद्र सेहवागने माजी दिग्गज क्रिकेटपटूंकडे आपला मोर्चा वळवला आहे. भारत-पाकिस्तान सामन्यातील समालोचनादरम्यान विश्रांती घेणाऱ्या सौरव गांगुली आणि शेन वॉर्न यांचे फोटो ट्विट करत सेहवागने खुशखुशीत शैलीत भाष्य केले आहे.
एजबस्टनमधील भारत-पाकिस्तान सामन्यात समालोचनाची जबाबदारी सौरव गांगुली आणि शेन वॉर्न यांच्याकडे होते. समालोचनादरम्यान काही वेळ ब्रेक घेत गांगुली आणि वॉर्न झोपले होते. या दोघांचे फोटो ट्विटरवर प्रसिद्ध करत सेहवागने त्यावर आपल्या मिष्किल शैलीत भाष्य केले आहे. ‘आपली स्वप्नेच आपल्या भविष्याला आकार देतात. त्यामुळेच हे दिग्गज स्वप्ने पाहत आहेत. झोपण्याची मजा,’ असे सेहवागने ट्विटमध्ये म्हटले आहे. सेहवागने या ट्विटमध्ये सौरव गांगुली आणि शेन वॉर्नला मेन्शनदेखील केले आहे.
The future is shaped by one’s dreams. These legends still don’t waste time in following their dreams. Sone ka Maza@SGanguly99 @ShaneWarne pic.twitter.com/2zgZEC4KWa
— Virender Sehwag (@virendersehwag) June 5, 2017
आधी मैदानावर कायम झंझावाती फलंदाजीमुळे चर्चेत असणारा सेहवाग आता त्याच्या ट्विटरवरील बॅटिंगमुळे चर्चेत असतो. ‘मुलासोबत खेळण्याआधी भारतीय संघ नातवासोबत खेळतो आहे,’ असे ट्वीट करत सेहवागने एकाच ट्विटमधून पाकिस्तान आणि बांगलादेश असे दोन पक्षी मारले होते. यानंतर भारत-पाकिस्तान सामन्याआधी सेहवागने पाकिस्तानी नागरिकांना रेडिओ विकत घेण्याचा सल्ला ट्विटरवरुन दिला होता. ‘पाकिस्तानी नागरिकांनी रेडिओ विकत घ्यावा. सामना हरल्यावर टीव्ही फोडण्यापेक्षा रेडिओ फोडावा. रेडिओ टीव्हीपेक्षा स्वस्त असतो,’ असे ट्वीट सेहवागने केले होते.
रविवारी भारताने पाकिस्तावर १२४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. फलंदाजांपाठोपाठ भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत पाकिस्तानला अक्षरश: लोळवले. भारताच्या पहिल्या ४ फलंदाजांनी या सामन्यात अर्धशतके झळकावत ३१९ धावा केल्या. यानंतर डकवर्थ लुईसनुसार पाकिस्तानसमोर ३२४ धावांचे आव्हान होते. मात्र भारतीय गोलंदाजांनी ठराविक अंतराने पाकिस्तानला धक्के दिले आणि पाकिस्तानचा १६४ धावांमध्ये संपुष्टात आला. वेगवान अर्धशतक झळकावणाऱ्या युवराज सिंगला सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आले.