दुबई : भारतीय संघाने मागील तीन वर्षांत सातत्यपूर्ण कामगिरी करताना घरच्या मैदानावर आणि परदेशातही यशस्वी कामगिरी केली आहे. त्यामुळे केवळ दोन सामन्यांतील निराशाजनक कामगिरीवरून भारतीय संघाविषयी कोणतेही मत बनवणे योग्य नसल्याचे भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने म्हटले आहे. भारतीय संघाला ट्वेन्टी-२० विश्वचषकातील पहिल्या दोन सामन्यांत पाकिस्तान आणि न्यूझीलंडने मोठ्या फरकाने पराभूत केले होते. ‘‘मागील दोन-तीन वर्षांत आम्ही केवळ भारतात नाही, तर परदेशातही चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे केवळ दोन सामन्यांतील निराशाजनक कामगिरीमुळे आमच्याविषयी मत बनवणे चुकीचे ठरेल. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये कोणताही संघ पराभूत होऊ शकतो. तुम्ही त्याचा फार विचार न करता पुढील सामन्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे,’’ असे जडेजा म्हणाला. भारतीय खेळाडूंची स्कॉटलंडच्या ‘ड्रेसिंग रूम’ला भेट दुबई : कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मासह भारतीय संघातील खेळाडूंनी ट्वेन्टी-२० विश्वचषकात शुक्रवारी झालेल्या सामन्यानंतर स्कॉटलंडच्या ‘ड्रेसिंग रूम’ला भेट दिली. विराट, रोहित, जसप्रीत बुमरा आणि रविचंद्रन अश्विन यांनी स्कॉटलंड संघातील खेळाडूंशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. ‘‘विराट कोहलीसह भारतीय खेळाडूंनी वेळ काढून आमच्या खेळाडूंशी संवाद साधल्याबद्दल आभार,’’ असे स्कॉटलंड क्रिकेट मंडळाने ‘ट्वीट’मध्ये म्हटले आहे. तसेच त्यांनी भारत आणि स्कॉटलंडचे खेळाडू संवाद साधतानाची छायाचित्रे प्रसिद्ध करताना त्याखाली ‘अमूल्य’ असे लिहिले. भारताने या सामन्यात उत्कृष्ट खेळ करताना आठ गडी राखून मोठा विजय मिळवला. स्कॉटलंडचा डाव ८५ धावांत आटोपल्यावर भारतीय संघाने हे लक्ष्य अवघ्या ६.३ षटकांत गाठले.