विनय नारकर

आजच्या जागतिकीकरणाच्या काळात सगळे जग जवळ येत असतानाच प्रत्येक घटकाला एक प्रश्न सतावू लागलाय. ‘माझे वेगळेपण काय आहे?’ या प्रश्नामुळे भांबावलेपणाबरोबरच आपली समाजघटक म्हणून मर्मस्थाने, बलस्थाने काय आहेत, याबद्दल ऊहापोह होऊ  लागला आहे. जागतिक स्तरावर विचार करताना भारतीय समाजाचं वेगळेपण दाखवणाऱ्या ज्या गोष्टी प्रामुख्याने आपण नमूद करू शकतो त्यामध्ये ‘साडी’ हा वस्त्रप्रकार अग्रक्रमाने घ्यावा लागेल. भारतीय आणि साडी हे समीकरण जगाने स्वीकारले आहे.

‘साडी’ या वस्त्रप्रकारात हजारो वर्षांत बदल होत गेले. बदलत्या काळानुसार, गरजांनुसार बदलल्यामुळे साडी केवळ टिकून राहिली नाही, तर प्रत्येक काळात वैभवाने तळपत राहिली. साडीच्या रचनावैशिष्टय़ांपैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘लवचीकता’. या लवचीकतेमुळे साडी कधीही कालबाह्य़ होऊ  शकली नाही. याचा सर्वात महत्त्वाचा फायदा कुठे झाला असेल तर तो आहे, भारतीय हातमाग वस्त्रकला टिकून राहण्याला.. भारतात हजारो वर्षांपासून हातमागावर असंख्य वस्त्रप्रकार बनत आले आहेत. त्यापैकी काहींबद्दल आपण या सदरातून जाणून घेत असतो. या वस्त्रप्रकारांपैकी बहुतेक प्रकार, कालौघात होणाऱ्या बदलांना बळी पडले. काही पूर्णपणे यंत्रमागावर बनू लागले. काही वस्त्रप्रकार साडीमध्ये रूपांतरित होऊ न टिकले. पण साडी हा वस्त्रप्रकार सगळे बदल, सगळी आक्रमणं पचवून दिमाखात उभा आहे. साडीमुळे भारतीय हातमाग परंपरा टिकून राहू शकली, या दृष्टीनेही या वस्त्रप्रकाराकडे पाहिले पाहिजे.

साडी हा हजारो वर्षांच्या भारतीय समाजजीवनातील महत्त्वाचा समान दुवा आहे. एखाद्या वस्त्रप्रकाराच्या अशा कालातीत लोकप्रियतेची कारणेही तशी रोचकच असणार. उपयुक्तता हे साहजिकपणे महत्त्वाचे कारण आहे. कामात असताना किंवा हालचाल करावी लागत नसताना, स्त्री आपल्या नेसलेल्या साडीमध्ये सोयीनुसार बदल करीत राहते.

देवपूजेच्या वेळेस डोईवर असणारा पदर सख्यांसोबत पाणी भरताना खांद्यावर येतो, मग रांधायला सुरुवात केली की कमरेला विळखा घालून पुढे खोचला की उरक आणि बळ देतो. आजच्या आधुनिक स्त्रीने घर आणि दार सांभाळण्याची कसरत करताना जरी अन्य पोशाख निवडले असले तरी कोणताही समारंभ वा सण असला की पारंपरिक साडीच्या दिमाखाचा मुकाबला करू शकेल असा एकही पर्याय भारतीय स्त्रीचे मन काबीज करू शकला नाही.

आजच्या उच्चशिक्षित भारतीय स्त्रीने, मग ती कॉर्पोरेट क्षेत्रातील अधिकारी, पत्रकार, लेखक, व्यावसायिक, प्राध्यापक, अभिनेत्री, कलाकार अथवा अन्य कुठल्या क्षेत्रातील स्त्री असो, आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवण्यासाठी तिला साडीचा ज्या प्रकारे उपयोग होतो, तसा अन्य पेहरावाचा होत नाही.

प्रत्येक स्त्रीची साडी नेसण्याची, हाताळण्याची ढब वेगळी असते. स्त्रीच्या साडी हाताळण्याच्या ढबीनुसार ती लाजरीबुजरी आहे की तेजतर्रार, अंतर्मुखी आहे की मिलनसार, गंभीर आहे की खेळकर, विचारी आहे की उठवळ या बाबी दिसत राहतात. साडी तिच्यासाठी फक्त पेहराव न राहता तिची अभिव्यक्ती होते. मला वाटतं यातच साडी ही स्त्रीच्या खास जिव्हाळ्याचा भाग होण्यामागचं गुपित आहे.

भारतातील कोणत्याही भाषेतील कवींना साडीवर, साडीतल्या ललनांवर काव्य करण्याची ऊर्मी अनावर झाली आहे. साडीमध्ये स्त्रीसौंदर्य कसे खुलून येते यावर सगळ्या भाषांमधल्या कवींनी भरपूर काव्यरचना केली आहे. साडीच्या रचनेतील अखंड विस्तार, या रचनेतील अंगभूत लवचीकता यांनी डिझायनरना सतत नवनवे प्रयोग करायला उद्युक्त केले आहे. अन्य कोणत्याही पोशाखात नसलेला अखंड अवकाश डिझायनरच्या अभिव्यक्तीला स्फुरण आणि आव्हान देत राहतो.

आजकाल ‘साडी सख्यांचे’ कित्येक समूह शहरांतून बनले आहेत. या साडी सख्यांमध्ये ‘हातमाग साडी’ हाच एकमेव दुवा असतो. हातमागाच्या साडय़ा नेसणे, त्यातल्या जुन्या परंपरा व नवे प्रयोग साजरे करणे हाच निखळ उद्देश साडी सख्यांचा असतो. यातून हातमागाबद्दल जागरूकता, परंपरांबद्दल बांधिलकी आणि स्वत:च्या आवडीबद्दल स्पष्टता या सर्व गोष्टी वृद्धिंगत होतात. ‘साडी सख्या’ या निर्मळ आनंदासाठी आणि अभिव्यक्तीसाठी हा साडी उत्सव साजरा करतात, (कुठल्याही प्रकारे पुरुषांच्या ‘लक्षवेधा’साठी नाही हे मी आवर्जून नमूद करू इच्छितो). हे भाग्य दुसऱ्या कुठल्याही वस्त्रप्रकाराला मिळण्याची शक्यता वाटत नाही.

आज भारतात साडी नेसण्याच्या किमान शंभर पारंपरिक पद्धती अस्तित्वात आहेत. साडीच्या अखंड विस्तारामुळे आणि विविध समाजघटकांच्या सांस्कृतिक अभिव्यक्तीच्या गरजांमुळे या पद्धती विकसित झाल्या. शेकडो वर्षांपासून या पद्धती चालत आल्या आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला सामाजिक अभिसरणाला खऱ्या अर्थाने गती येऊ  लागली. स्त्रियांचा संपर्क ‘बाहेरच्या’ जगाशी येऊ  लागला तेव्हा मात्र या साडी नेसण्याच्या पद्धतींमध्ये बदल घडून येण्याची गरज निर्माण झाली. यामध्ये सोय, सुटसुटीतपणा आणि त्याबरोबरच बदलत्या सामाजिक शिष्टाचारांचाही विचार अंतर्भूत होता. ही सर्व आव्हाने ‘साडी’ने लीलया पेलली, स्वत:मध्ये आनुषंगिक बदल घडवून साडी ही ‘स्वयंसिद्धा’ बनली.