बदलत्या काळानुसार सौंदर्याची संकल्पना बदलत चालली आहे. प्रत्येक व्यक्ती प्रेझेंटेबल दिसण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात.त्यातच मग अनेक तरुणी,महिला ओघाओघाने सौंदर्यप्रसाधनांचा वापर करताना दिसतात. मात्र या प्रसाधनांचा अतिवापर केल्यामुळे त्वचेला हानी पोहोचण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे अनेक वेळा चेह-यावर पुटकुळ्या येणे, त्वचा काळवंडणे यासारख्या समस्या निर्माण होतात. या समस्यांपासून सुटका करुन घ्यायची असेल तर नैसर्गिक घटकांची मदत घेणे फायदेशीर ठरते. आजीबाईच्या बटव्यामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्या वापरामुळे शारीरिक समस्यांपासून सुटका मिळेल. त्यातलाच एक घटक म्हणजे कडूनिंबाचा पाला. कडूलिंबाच्या पाल्यामध्ये अनेक उपयुक्त घटक असून त्याच्या वापरामुळे त्वचेसंदर्भातील आजार, समस्या दूर होण्यास मदत होते. कडूनिंबापासून तेल, साबण,पेस्ट यासारख वस्तूंचे उत्पादन करता येते. कडूनिंबामध्ये अॅटी सेफ्टिक, अॅटी बॅक्टेरिअल हे गुणधर्म आहेत. कडूनिंबाचे हेच गुणधर्म त्वचेसाठी फायदेशीर असतात. त्यामुळे त्वचेसंदर्भात कोणतीही समस्या असल्यास कडूनिंबाच्या पानांचा किंवा पेस्टचा वापर करणे फायदेशीर ठरते. कडूनिंबाच्या पानांच्या पेस्टमुळे दूर होणारे असेच काही उपयोग दिक्षा झाब्रा यांनी सांगितले आहेत ते पुढील प्रमाणे - १. चेह-यावरील डाग दूर होतात - तरुण वयातील प्रत्येक व्यक्तीला एकदा तरी तारुण्यपिटीकेचा सामना करावा लागतो. या तारुण्यपिटीकेमुळे चेह-यावर डाग किंवा खड्डे निर्माण होतात. त्यामुळे चेह-यातील आकर्षकता कमी होते. चेह-यावरील हे डाग दूर करण्यासाठी कडूनिंबाची पाने आणि तुळशीची पाने एकत्र करु त्याचा लेप तयार करावा हा लेप गुलाब पाण्यात मिसळून चेह-यावर लावावा. लेप वाळल्यानंतर गार पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. यामुळे चेह-यावरील डाग कमी होण्यास मदत मिळते. २. त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते - सतत उन्हामध्ये फिरल्यामुळे अनेकांचा चेह-या टॅन होतो.त्वचा काळवंडली जाते. अशावेळी प्रसाधनांचा वापर करण्यापेक्षा कडूनिंबाच्या पानांचा वापर कधीही योग्यच ठरेल. काळवंडलेली त्वचा पुन्हा उजळविण्यासाठी कडूनिंबाची काही पाने, गुलाबाच्या पाकळ्या एकत्र करुन त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट गुलाबपाण्यात मिसळून हा लेप चेह-यावर लावा. लेप वाळल्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धूवा. ३. त्वचेतील ओलावा टिकून राहतो - काही व्यक्तींची त्वचा कोरडी असते. अशा व्यक्ती त्वचेतला ओलावा टिकून ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतात. याच प्रयत्नामध्ये मॉश्चरायझरचा वापर करण्यात येतो मात्र कालांतराने या प्रसाधनांचा साईड इफेक्ट जाणवू लागतो. हा साईड इफेक्ट टाळण्यासाठी प्रसाधनांचा वापर करण्यापेक्षा घरी तयार केलेल्या नैसर्गिक मॉश्चरायझरचा वापर करावा. यामुळे त्वचेमध्ये ओलावा टिकवण्याबरोबरच त्वचेसंदर्भातील अन्य समस्याही दूर होतात. यासाठी कडूनिंबाच्या पानांच्या पेस्टमध्ये थोडंस मध मिसळून हा लेप १५ मिनीटे चेह-यावर लावावा. त्यानंतर धूवुन चेहरा स्वच्छ करावा. यामुळे त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो. ४. चेह-यावरील अतिरिक्त तेल कमी होते - अनेक वेळा चेह-यावर अतिरिक्त तेल जमा झाल्यामुळे चेह-यावर पुटकुळ्या येतात. यातूनच मग चेह-यावर डाग पडण्याची समस्या निर्माण होत असते. या समस्येपासून वाचण्यासाठी कडूनिंब गुणकारी ठरत असून कडूनिंबाच्या वापरामुळे चेह-यावरील अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत होते. यासाठी कडूनिंबाची पेस्ट दही आणि लिंबाचा रस यांच्यासह एकत्रित करुन २० मिनीटे चेह-यावर लावा त्यानंतर चेहरा स्वच्छ धूवा. हा लेप आठवड्यातून एकदा लावल्यामुळे चेह-यावरील अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत होते. ५. चेह-यावरील सुरकुत्या कमी होतात - वय वाढत गेलं की त्याच्या खुणा चेह-यावर दिसू लागतात. यातूनच चेह-यावरील त्वचा सैल होऊन सुरकुत्या पडू लागतात. या सुरकुत्या कमी करण्यासाठी कडूनिंबाचा वापर होऊ शकतो. यासाठी कडूनिंबाच्या पेस्टमध्ये चंदनाची पावडर एकत्र करुन हा लेप चेह-यावर लावावा. त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.