सध्याच्या धकाधकीच्या जीवनाला शरण गेलेला सामान्य माणूस प्रत्येक दिवशी चार महत्त्वाच्या गोष्टी विसरत असल्याचे संशोधनातून पुढे आले. काही महत्त्वाची माहिती, कार्यक्रम, टिपणं यापैकी कोणत्याही चार गोष्टी सर्वसामान्य व्यक्ती प्रत्येक दिवसाला विसरते, असे संशोधनात आढळले. प्रत्येक वर्षाला सर्वसाधारण व्यक्ती १४६० गोष्टी लक्षात ठेवून वेळेत पूर्ण करायला विसरते.
संशोधकांनी इंग्लंडमधील एकूण दोन हजार व्यक्तींचे सर्वेक्षण केले. सर्वसाधारणपणे विसरण्यात येणाऱया ५० गोष्टींची यादी संशोधकांनी तयार केली. त्यामध्ये घरातील एखाद्या खोलीत आपण का गेलो, हे अनेकांना लगेचच लक्षात येत नाही. अनेक जण घरातून बाहेर पडताना मोबाईल घ्यायला किंवा पाकिट घ्यायला विसरतात. पुरुष हे शक्यतो पत्नीच्या किंवा लग्नाच्या वाढदिवसाची तारीख विसरतात, असे संशोधकांना आढळून आले.
जर एखादी गोष्ट करायला विसरले, तर महिलांना त्याबद्दल खूप वाईट वाटते. कामाचे वाढलेले तास, आर्थिक भीती, धकाधकीचे जीवन यामुळे चांगली स्मृती असलेल्या व्यक्तीही काही साध्या गोष्टी नक्की विसरतात, असे संशोधकांनी सांगितले.