रायन पिंटो

सध्या संपूर्ण जग, देश ज्या परिस्थितीतून जात आहे.त्यावरुन कोणत्याही व्यक्तीला ताण येणं ही सहाजिक आहे. लॉकडाउन असल्यामुळे प्रत्येक जण घरात आहे. त्यामुळे अबाल-वृद्धांपासून प्रत्येक जण घरात बसून आता कंटाळला आहे. त्यातच दैनंदिन काम करत असताना बऱ्याच वेळा आपण अनेक कठीण प्रसंगांना समोरं जात असतो. सतत ताणतणावात राहिल्यामुळे आपलं मानसिक स्वास्थ बिघडू शकतं. विशेष म्हणजे ताण हा केवळ मोठ्या व्यक्तींनाच येतो असं नाही, तर ताण हा लहान मुलांनाही येऊ शकतो. मात्र आपली मुलं तणावाखाली आहेत हे कसं ओळखावं असा प्रश्न बऱ्याच पालकांना पडतो. त्यामुळे मुलांची मानसिक स्थिती जाणून घेण्यासाठी त्यांच्यात झालेले पाच महत्त्वाचे बदल समजून घेणं गरजेचं आहे.

१. अबोला-
तुमच्या मुलांच्या बोलण्यात फरक जाणवत असेल. अचानकपणे ती शांत झाली असतील तर ते मानसिक तणावाखाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही पती-पत्नी दोघंही नोकरी करणारे असाल, तर घरी राहणाऱ्या मुलांशी व्हिडीओ कॉल किंवा फोनद्वारे संपर्कात रहा. त्यांच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या. त्यांचं मन एखाद्या कामात रमेल याचा प्रयत्न करा. त्यामुळे त्यांच्या मनावरील ताण हलका होण्यास मदत होईल.

२. काळजी वाटणे –
जर तुमची मुलं सतत काळजीत किंवा चिंतेत असतील तर त्यांच्याकडे लक्ष द्या. कारण जर त्यांच्या मनात एखाद्या गोष्टीची भीती असेल तरच ते चिंतेत दिसतील. तुम्ही कोणत्याही विषयावर बोलत आहात, किंवा ऐकत असाल आणि ते पाहून तुमची मुलं सतत प्रश्न विचारत असतील, तर त्यांच्या मनावर ताण असू शकतो. त्यामुळे त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर जरुर द्या पण त्यामुळे त्यांच्या मनावर कोणताही परिणाम होणार नाही याचीही काळजी घ्या. तसंच सध्या सर्वत्र करोनाची चर्चा आहे. त्यामुळे याविषयी त्यांच्यात जागृती निर्माण करा. मात्र भीती निर्माण करु नका. त्यांच्या मनात भीती निर्माण झाली तर ते चिडचिड करायला लागती.

३. झोप आणि खाण्याच्या सवयीत बदल होणे –
मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये किंवा झोपण्याच्या सवयीत अचानक बदल होतो. कधी ते जास्त वेळ झोपतील, कधी त्यांना झोप लागणार नाही. अनेक वेळा मनावर ताण असल्यामुलांना वाईट स्वप्न पडतात किंवा ते एखाद्या गोष्टीचा विचार करत असतील तर त्यांना झोप लागणार नाही.त्यामुळे त्यांच्या जेवणाच्या आणि झोपण्याच्या सवयींचे निरीक्षण करा. जर तुम्हाला या सवयींत प्रचंड मोठा बदल दिसून आला तर त्या सवयींत सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या पाल्याच्या जेवणाच्या वेळा, झोपेच्या वेळा, खेळायचा वेळ, अभ्यासाचा वेळ आणि ऑनलाइन किंवा ऑफलाइन स्रोतांचा वापर करून घरात करता येतील अशा अभ्यासाव्यतिरिक्तच्या अॅक्टिव्हिटी यांचा विचार करून तुम्हीच त्याच्यासाठी एक आरोग्यपूर्ण असा दिनक्रम तयार करा. जेवण आणि झोपण्याच्या सवयींवर लक्ष ठेवल्याने त्यांचा ताणच कमी होणार नाही तर मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आरोग्यपूर्ण रहायलाही त्यांना मदत होईल.

४. आक्रमकता आणि लहरीपणा –
आक्रमकता आणि लहरीपणा ही पण मनावर ताण असल्याची लक्षणं आहेत. आज दर १० पैकी ८ पालक नोकरी करतात आणि लॉकडाऊनमुळे घरातून काम करत आहेत. एरवी आईवडील घरात नसल्याची मुलांना सवय असते आणि आता अचानकच आईबाबा दोघेही घरातून काम करत आहेत त्यामुळेही त्यांचा मुलांशी संवाद कमी होऊ शकतो. तसेच पालकांनाही घरातून काम करायला लागल्यामुळेही आक्रमकपणा आणि चिडचिडेपणा होऊ शकतो. सांगितलेल्या गोष्टी न ऐकणे किंवा हातातील वस्तू अचानकच फेकून मारणे, नको त्या वस्तू मागणे किंवा प्रश्न विचारणे ही लक्षणे जर मुलांमध्ये दिसत असतील तर त्याकडे काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. अशावेळी मुलांना सांगून जर ती ऐकत नसतील तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा मुलांचं समुपदेशन करा.

५. सोशल मीडियाचा वाढता वापर –
सध्या सोशल मीडिया हे करमणुकीचे आणि गुंतवून ठेवणारे महत्त्वाचे साधन झाले आहे. वयात येण्यापूर्वीची आणि वयात आलेली अशा सर्वच मुलांना स्मार्टफोन उपलब्ध आहेत आणि ती आधीपासूनच सोशल मीडियावर अडकून पडलेलीच आहेत. जर तुमची मुलं घरातल्यांशी किंवा मित्रांशी प्रत्यक्ष बोलणे आणि भेटणे यावर फार भर न देता सोशल मीडियावरच खूप वेळ घालवत असतील तर त्यांच्या या सवयीकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सोशल मीडियावर वेळ घालवण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. सोशल मीडियावरील आभासी (व्हर्च्युअल) व्यक्तिमत्व, प्रतिमा, जीवनशैली याची तुलना करण्याच्या सवयीमुळेही मुलांच्या मनांत असुरक्षितता किंवा चुकीच्या गोष्टींबाबत स्पर्धा करण्याची इच्छा निर्माण होते.

(रायन पिंटो हे रायन इंटरनॅशनल ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटचे सीईओ आहेत)