साधारणपणे उन्हाळा ऋतू सुरु झाला की बाजारात रानमेवा दिसू लागतो. आंबे, कैऱ्या, चिंचा, जांभूळ, ताडगोळे अशी अनेक फळं या ऋतूमध्ये सहज उपलब्ध होतात. यामध्येच जांभूळ हे फळ अनेकांच्या आवडीचं आहे. जांभळ्या रंगाचं थोडंस गोड, आंबट अशा चवीचं जांभूळ शरीरासाठी अमृतासमान आहे. त्यामुळे जांभूळ खाण्याचे नेमके फायदे कोणते जे जाणून घेऊयात. १. जांभळामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे शरीरातील रक्त शुद्ध आणि लाल होतं. २. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ३. पोटदुखी, अपचन या समस्यांवर जांभळाचं सरबत प्यावं. ४. मधुमेहींसाठी जांभूळ अमृतासमान आहे. जांभळामुळे शरीरातील साखर नियंत्रणात राहते. ५. पोटात मुरडा येणे, अतिसार अशा समस्यांमध्ये जांभळाची साल स्वच्छ धुवून पाण्यात उकळावी व हा काढा सकाळी व संध्याकाळी १ कपभर प्यावा. याने पोटात येणारी कळ थांबून जुलाब थांबतात. ६. दात व हिरड्या कमकुवत झाल्यास किंवा त्यातून रक्त येत असल्यास जांभळाच्या सालीच्या काढ्याने गुळण्या कराव्यात. ७.आम्लपित्ताचा त्रास होत असल्यास जांभळाच्या पानांचा रस आणि गूळ समप्रमाणात घ्यावे. त्यानंतर ते एकत्र करुन एका भांडय़ामध्ये ठेवून त्याला कापडाचे झाकण लावावे व ४-५ दिवस उन्हात ठेवावे, त्यानंतर तयार झालेला रस सकाळ संध्याकाळ २ चमचे घ्यावा याने आम्लपित्ताचा त्रास कमी होतो. ८. मूळव्याधीतून जर रक्त पडत असेल तर रोज दुपारी जेवणानंतर मूठभर जांभळे खावीत किंवा जांभळाचे सरबत, मध घालून प्यावे. हे प्यायल्याने रक्तस्राव थांबतो व शौचास साफ होते. सावधानता – जांभूळ कधी रिकाम्यापोटी खाऊ नये. असे खाल्ल्यास घसा व छाती भरल्यासारखी होते. तसंच कच्ची जांभळेदेखील खाऊ नयेत. (ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)