संभाषण कौशल्य हे आपण अगदी लहान असल्यापासून शिकत आलेलो आहोत. मोठ्या माणसांशी कसे बोलायचे, वृद्ध माणसांशी कसे बोलायचे त्या पासून अगदी आपल्या मैत्रिणींशी-मित्रांशी, नोकरीतील सोबतच्या सहकाऱ्यांशी, कधी बॉससोबत तर कधी बिल्डिंग मधल्या वॉचमनशी. कधी,काय आणि कसे बोलायचे हे आपण आपल्याही नकळत शिकत जातो. लहानपणापासून आपले पालक आणि आजूबाजूचे लोक एकमेकांशी कसे बोलतात यावरुन आपण ते आत्मसात करतो. आपल्याला काहीसा साधा वाटणारा हा विषय काही अभ्यासकांनी मात्र विशेष अभ्यासला आहे. आपला मेंदू कसे बोलायचे हे शिकतो तरी कसे याचा त्यांनी आपल्यापरिने अभ्यास केला आणि त्यांना अनेक गोष्टींचा उलगडा झाला. संभाषण कौशल्ये हि जरी नैसर्गिक प्रक्रिया असली तरी ती बऱ्याचदा तुमच्या आसपासच्या घडामोडींवर अवलंबून असते. सगळ्यात महत्त्वाची आणि आपली समोरच्यावर छाप पाडणारी गोष्ट म्हणजे पहिली भेट. इंग्रजीमध्ये ज्याप्रमाणे म्हटले जाते तसे "First Impression is the last impression'' त्यामुळे तुमचे पहिले बोलणे अतिशय चांगले असणे गरजेचे असते. यातही पहिल्या भेटीत संभाषण सुरु करण्यापूर्वी कोणती खबरदारी घ्यावी हे शिकणे गरजेचे आहे. संभाषणकलेत पहिल्या भेटीला खूप महत्व दिले गेले आहे. खूप खोलवर अभ्यास केल्यावर असे आढळून आले आहे की कोणत्याही संभाषणाचे तीन भाग पडतात, सुरुवात मध्य आणि शेवट. सुरुवातीच्या भागात समोरच्या व्यक्तीची माहिती मिळवणे,त्याच्या आवडीच्या-नावडीच्या गोष्टींची यादी तयार करणे, त्याला भेटण्याआधी कोणत्या विषयावर कसे आणि काय बोलायचे आहे, त्या व्यक्तीला कोठे भेटायचे आहे हे सर्व आपले मेंदू अगदी सहजपणे ठरवतो आणि त्याप्रमाणे कामाला लागतो. पहिल्या भेटीचे रूपांतर त्याला एका चांगल्या नात्यात करायचे असते त्यामुळे प्रत्येकाचा मेंदू अशा क्षणी खूप सतर्क असतो.आता सुरुवातीच्या काळात संभाषण करताना कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती पुढील लेखात घेऊया. अवधूत नवले