शरीराला ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. हवेमधून आपल्याला कायमच ऑक्सिजन मिळत असतो. तसाच वड, तुळस हेदेखील आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा करत असतात. मात्र सध्याच्या काळामध्ये वातावरणात प्रचंड प्रमाणात बदल होत आहेत. प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेकांना श्वसनासंबंधीचे आजार, दमा, मायग्रेन, फुफ्फुसाचा संसर्ग, खोकला या सारख्या समस्या निर्माण होत आहेत. दिवसेंदिवस याचे प्रमाणदेखील वाढत आहे. त्यामुळे या समस्यांपासून सुटका करुन घ्यायची असेल तर काही नैसर्गिक घटकांच्या माध्यमातून आपण यावर मात करु शकतो. या नैसर्गिक घटकांमध्ये तुळस ही अत्यंत उपयुक्त आहे. अंगणात डोलणारी तुळस जितकी मोहक आणि प्रसन्न वाटते त्याप्रमाणेच ती आपल्या आरोग्य सुधारण्यासाठीही तितकीच महत्वाची असते. आयुर्वेदिक आणि निसर्गोपचार औषधांमध्येही तिचा मोठ्या प्रमाणावर वाटा आहे. तुळशीचे केवळ पानेच गुणकारी नसून या वनस्पतीची फुलेही तितकीच बहुगुणी आहेत. त्यामुळे पुढील काही आरोग्य समस्यांवर मात करण्यासाठी तुळस वनस्पती हे उत्तम औषध ठरते.. १. ताप - अनेक वेळा वातावरणात बदल झाला की काहींना लगेच ताप वैगरे सारखे आजार होतात. यावर अनेक उपाय केल्यानंतरही काहींना फरक जाणवत नाही. अशा वेळी दारापुढील तुळस कामी येते. ऑक्सिजन देण्यासोबतच तुळस तापावरही गुणकार आहे. ताप आल्यानंतर तुळशीच्या पानांचा रस काढावा आणि १ -२ चमचे सेवन करावा त्यामुळे ताप उतरण्यास मदत होते. २. सर्दी- सर्दी झाल्यानंतर अनेक वेळा नाक चोंदणे, श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या समस्या निर्माण होता. अशावेळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने चघळल्याने सर्दी दूर होऊ शकते. ३. डोकेदुखी- अतिउष्णतेने डोकेदुखीची समस्या निर्माण होणे ही सामान्य गोष्ट आहे. अशावेळी तुळशीची पाने आणि चंदनाची पेस्ट करून कपाळावर लावावी. यामुळे नक्कीच डोकेदुखी कमी होण्यास मदत होते. ४. डोळ्यांची समस्या- डोळ्यांच्या समस्यांवर तुळशीच्या काळ्या पानांचा रस महत्त्वाची भूमिका निभावतो. तुळशीच्या काळ्या पानांच्या (कृष्ण तुळस) रसाचे काही थेंब डोळ्यात टाकल्याने दाहकात कमी होण्यास मदत होते. ५. दातांची समस्या- तुळशीच्या पानांची पावडर मोहरीच्या तेलात मिसळून पेस्ट तयार करून या पेस्टने दात घासावेत. यामुळे हिरड्या, दात दुखणे यावर तात्काळ उपचार होतो. ६. कीटक चावणे- डास आणि इतर कीटकांचे चावणे मुख्यत: मान्सूनच्या महिन्यात अशा समस्या वाढतात. अशावेळी ज्या ठिकाणी किटक चावला आहे तेथे तुळशीच्या मुळांची पेस्ट लावावी. ७. किडनी स्टोन- किडनी स्टोनच्या समस्येला सामोरे जाणाऱयांनी मध आणि तुळशीच्या पानांच्या रस मिश्रित मिश्रण प्यावे. ८. मानसिक तणाव- रोजच्या धाकाधकीच्या जीवनात मानसिक तणाव निर्माण होणे हेही रोजचे झाले आहे. तणाव विरहीत जीवन जगण्यासाठी रोज १० ते १२ तुळशी पाने रोज खावीत. तुळशीची पाने तणावावर मात करणारे शस्त्र म्हणून काम करतात.