-डॉ. मंजुषा अग्रवाल पावसाळा हा ऋतू प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. मात्र या ऋतूबरोबर काही आजारपणही येतच असतं. त्यातच सध्या संपूर्ण जगावर करोनाचं सावट आहे. त्यामुळे सध्या या काळात प्रत्येकाने विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. पावसाळ्यात बऱ्याच वेळा जमिनीवर साचणाऱ्या दुषित पाण्यामुळे आजार पसरतात. तसंच या काळात डायरिया, कॉलरा, वाताचे विकार या पाण्यामुळे होणार्या आजारांबरोबरच सर्दी, खोकला- पडसे यासारखे आजार जडतात. दूषित पाण्यामुळे कावीळ, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस यांसारखेही विकार जडतात. याशिवाय पावसाळ्यात आपली पचनक्रिया मंदावते आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होत असल्याने यांसारखे संसर्गजन्य आजारांची लागण होते. पावसाळ्यात अनेकदा संसर्गजन्य आजारांसह त्वचारोग, फंगल इन्फेक्शन, मुरूम यांसारखे विकारही उद्भवू शकतात. तसेच श्वसनविकाराची समस्या बळावते. त्यातच आता करोना असल्याने आजार वाढण्याची शक्यता अधिक असू शकते. पावसाळ्यात ताप, सर्दी व खोकल्याचे रूग्ण वाढतात. ही सर्व करोनाची लक्षणे आहेत. हे आजार टाळायचे असल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढवणे हा एकमेव पर्याय आहे. यासाठी पौष्टिक आहाराच्या सेवनासह आरोग्याकडेही विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. १. दुषित पाणी पिऊ नका – अनेक वेळा पावसाळ्यात दुषित पाणीपुरवठा होतो. नदीमध्ये सांडपाणी, कचरा, घाण हे मिसळल्यामुळे हे पाणी पिणं शरीरासाठी घातक असतं. असं दुषित पाणी प्यायल्यामुळे उलट्या, जुलाब, अतिसार, कॉलरा, हगवण, टायफॉइड आणि कावीळ यांसारखे अनेक साथीचे आजार होत असतात. पावसाळ्यात उकळून थंड केलेले स्वच्छ पाणी प्यावे. पाणी गरम करून वापरल्यामुळे पाण्यातील जंतू नष्ट होतात. २. रोगप्रतिकाशक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन करा – आपल्या आहारात रंगीबेरंगी पदार्थांचा समावेश करा. ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढेल. ब्रोकोली, गाजर, हळद आणि आले यासारखे पदार्थ आपली त्वचा आणि केसांसह रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. हळद ही औषधी वनस्पती असून यात अँटीऑक्सिडंट गुणधर्मांचा समावेश आहे. सर्दी व खोकल्यासाठी लसूण अतिशय गुणकारी आहे. व्हिटॅमिन सी असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा. श्वसनाची समस्या असणाऱ्यांसाठी आले खाणे अतिशय फायदेशीर आहे. पावसाळ्यात भरपूर पाणी प्या. ३. जखम साफ करा - जर तुम्हाला काही जखमा किंवा कट असल्यास ताबडतोब साफ करा. कारण त्वचेला जखम असल्यास पावसाच्या पाण्यात गेल्यास जंतुसंसर्ग होण्याचा धोका सर्वांधिक असतो. ४. उघड्यावरील दुषित अन्न खाणे टाळावे – या काळात बाहेरील उघड्यावरील पदार्थ, माशा बसलेले दूषित पदार्थ, शिळे अन्न, अर्धवट शिजलेले मांसाहारी पदार्थ खाणे टाळावे. कारण असे दुषित अन्न खाल्यामुळे पोटाचे विविध आजार, उलट्या, जुलाब, अतिसार, कॉलरा, हगवण, कावीळ यांसारखे अनेक आजार होत असतात. त्यामुळे पावसाळ्यात बाहेरील उघड्यावरील दूषित अन्न खाणे टाळावेत. ५. डासांपासून स्वतःचा बचाव करा – पावसात डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होतो. यामुळे डेंग्यू व मलेरिया यांसारखे आजार होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पावसाळ्यात डासांपासून बचाव करणे खूप गरजेचं आहे. यासाठी योग्य ती काळजी घ्या. डासांपासून बचाव करण्यासाठी घर व आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. घराच्या आजुबाजूला पाणी साचू देऊ नका. घरामध्ये डास प्रतिबंधक जाळ्या, मच्छरदाणी औषधे, क्रीम यांचा वापर करावा. घरामध्येही फुलदाणी, फिशटॅंक यांची वेळोवेळी स्वच्छता ठेवावी. कारण अशा साठवलेल्या स्वच्छ पाण्यातच डेंग्यूच्या डासांची पैदास होत असते. ६. पावसात भिजू नये – पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालेला असतो. पुरसे ऊन नसल्याने हवेतील बॅक्टेरिया आणि जंतूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे आपली प्रतिकार यंत्रणा कमकुवत होते. त्यामुळेच पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार होत असतात. यासाठी पावसाच्या पाण्यात भिजणे टाळावेत. पावसात भिजल्यास गरम पाण्याने हात-पाय धुवून घ्यावेत. अंग व केस टॉवेलने पुसून घ्यावेत. कारण भिजलेल्या केसात फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. तसेच पावसाळ्यात ओलसर कपडे घालणे टाळावे आणि पावसात भिजलेले कपडे जास्त वेळ अंगावर ठेवू नयेत ते लगेचच बदलावेत. ७. नियमित व्यायाम करा – बाहेर पाऊस पडत असला तरी घरी नियमित शारीरिक व्यायाम करा. कारण व्यायामामुळे आरोग्य उत्तम राहते. ( लेखिका डॉ. मंजुषा अग्रवाल याला मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटल येथे इंटरनल मेडिसीन सल्लागार आहेत.)