बारीक होणे ही सध्या काळाची गरज झाली आहे. स्वत:ला चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करायचे असल्यास चांगले दिसणे आवश्यक असते. त्यामुळे शरीरावरील चरबी वाढली असल्यास ती वेळीच कमी कऱण्याचे आव्हान लठ्ठ व्यक्तीसमोर असते. आपण जाड व्हायला लागलो की घरातील आणि बाहेरीलही अनेक लोक आपल्याला बारीक होण्यासाठी हे करा, ते करा असे फुकटचे सल्ले देतात. काही जण काही व्यायाम सांगतात तर अनेक जण ही गोष्ट इतकीच खा, याच वेळात खा, हे पदार्थ खाऊ नका असे सल्ले देण्यास सुरुवात करतात. आहाराचा आपल्या जीवनशैलीत महत्त्वाचा वाटा असला तरीही केवळ आहारावरील नियंत्रणामुळेच आपण बारीक होतो हा समज चुकीचा आहे. अनेकदा आहार न पाळताही इतर काही गोष्टींमुळे आपण बारीक होऊ शकतो. आता त्या गोष्टी नेमक्या कोणत्या जाणून घेऊया…

भरपूर पाणी प्या

शरीराच्या सर्व क्रिया सुरळीत व्हायच्या असतील तर शरीरात पाण्याचे प्रमाण पुरेसे असणे आवश्यक असते. मानवी शरीराला दिवसाला किमान ३ ते ४ लिटर पाण्याची आवश्यकता असते. तहान लागणे म्हणजेच डिहायड्रेशन असेही म्हटले जाते. त्यामुळे तहान लागण्याआधीच आपण पाणी प्यायलेले असायला हवे. अनेकदा कामाच्या नादात आपण पाणी पिण्याचे विसरतो. यामुळे आपल्याला डिहायड्रेशनचा त्रास होण्याची शक्यता असते. याबरोबरच जास्तीत जास्त पाणी प्यायल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. पाण्याबरोबरच फळांचे ज्यूस, स्मूदी यांचाही समावेश करणे आवश्यक असते.

कोणतेही पदार्थ वाईट नसतात

तुम्ही अन्नपार्थांमध्ये चांगले आणि वाईट अशी विभागणी करत असाल तर तुमचा बारीक होण्याचा हेतू साध्य होणार नाही. महिलांना तर चॉकलेट आणि ब्राऊनी सगळ्यात जास्त आवडतात. पण एकदा तुम्ही डाएटींग करायचे ठरवले आणि हे पदार्थ टाळायला लागलात तर तुम्हाला हे पदार्थ खाण्याची जास्तीत जास्त इच्छा होते आणि तुम्ही उलट हे पदार्थ जास्त खाता. त्यामुळे असे काहीच न करता नेहमीप्रमाणे डाएट ठेवा.

पुरेशी झोप आवश्यक 

तुम्हाला आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर पुरेशी झोप मिळणे आवश्यक असते. अपुऱ्या झोपेमुळे हार्मोन असंतुलित होतात. त्यामुळे वजन वाढते आणि पचनाशी निगडित समस्याही वाढतात.

सगळीकडे डाएट फूड शोधू नका

कमी कॅलरीज असणारे आणि स्निग्धता कमी असणारे पदार्थ खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते असे तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. त्याऐवजी तुम्ही नेहमी जे खाता तेच खाणे केव्हाही चांगले. अशाप्रकारे डाएट फूड म्हणून तयार केलेल्या पदार्थांमध्ये भरपूर कार्बोहायड्रेटस असतात ज्यामुळे वजन कमी होण्याचा उद्देश अपुरा राहतो. नेहमीचे घरातील अन्न खा म्हणजे तुमच्या शरीरात कृत्रिम घटक जाणार नाहीत.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही.)