|| डॉ. वैशाली मंदार जोशी पावसात चिंब भिजून उघड्यावर विकत असलेले वडे, समोसे व भजी खाताना मज्जा येते खरी, पण काही वेळा त्यामुळे होणाऱ्या गंभीर आजारांना तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात कावीळ, विषमज्वर, अतिसार यांसह हिवताप, डेंग्यू इत्यादी आजारांचा धोका अधिक असतो. या आजारांपासून वाचविण्यासाठी आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याची अत्यंत गरज असते. यासाठी आहारात काही बदल करणे आवश्यक आहे. १ घरचे ताजे व नैसर्गिक अन्न खावे. आहारातील समतोल राखण्यासाठी न्याहारीला पोहे, उपमा, अप्पे, घावणे, अंडी यांसारखे पदार्थ खावेत. दोन वेळेच्या जेवणात पोळी, वरणभात, विविध भाज्या, डाळी किंवा उसळी, कोशिंबिरी असा चौरस आहार असावा. पोळीऐवजी नाचणी, ज्वारी, बाजरी या विविध पिठांच्या भाकऱ्या तसेच थालीपीठ, पराठे असेही पदार्थ खाता येतील. या पदार्थांतून कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्व ‘ब’ व इतर जीवनसत्त्वे आणि खनिजे यांची शारीरिक गरज पुरविली जाते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. पावसाळ्यात कुठल्याही प्रकारच्या ब्रेडवर बुरशी लवकर येऊ शकते. त्यामुळे ब्रेड शक्यतो टाळावा. ब्रेड खाल्लाच तर तो ताजा व तव्यावर गरम करून खावा. २ प्रथिनांची गरज पुरविण्यासाठी इतर मांसाहारी पदार्थ घेण्यापेक्षा गाईचे दूध, दही व ताक असे पर्याय निवडावेत. हा ऋतू माशांचा प्रजननाचा काळ असल्यामुळे माशांच्या पोटात अंडी असू शकतात आणि असे मासे खाल्ल्यास काही वेळेला विषबाधा होऊ शकते. त्यामुळे मासे खाणे टाळलेलेच बरे. तसेच चिकन स्वच्छ करून व पूर्ण शिजवून खावे. शाकाहारी व्यक्तीने डाळी, कडधान्य, इडली व डोसा असे काही आंबवलेले पदार्थ, मिश्र डाळींच्या पिठाची धिरडी खावीत. कडधान्यांत प्रथिने तर असतातच, परंतु मोड आणणे या क्रियेमधून जीवनसत्त्व ‘क’चे प्रमाण अन्नपदार्थांत वाढते. त्यामुळे मोड आलेली कडधान्याची मिसळ किंवा भेळ हे पौष्टिक पदार्थ खावेत. तसेच आंबविणे या प्रक्रियेनेही पदार्थातील जीवनसत्त्व ‘क’चे प्रमाण वाढते. इडली, डोसा, उतप्पा, अप्पे हे पदार्थ अतिशय पौष्टिक ठरतात आणि पचायलाही हलके असतात. पनीर आवडत असेल तर घरी केलेले गाईच्या दुधाचे पनीर खावे अथवा गरम पाण्यात उकळून खावे. जीवनसत्त्व ‘ई’युक्त सुका मेव्याचा आहारात समावेश असावा. ३ रोजच्या आहारात जीवनसत्त्वे व खनिजे याच्या पुरवठ्यासाठी सर्व प्रकारची फळे व भाज्या खायला हवीत हे खरे; परंतु या ऋतूत काही फळे व भाज्या यांचा समावेश करताना थोडी अधिक काळजी घेणे आवश्यक असते. जीवनसत्त्व ‘क’युक्त काही भाज्या जसे पालेभाज्या, कोबी, फ्लावर आणि ब्रोकोली या स्वच्छ धुणे अवघड असते. त्यातून जंतुसंसर्गाची अधिक शक्यता असल्याने या पालेभाज्या टाळाव्यात किंवा किमान कोमट पाण्याने दोन-तीन वेळेला धुऊन मग खाव्यात. मशरूम मातीत उगवल्याने त्यात असू शकणाऱ्या विषाणूमुळे तेदेखील टाळलेलेच बरे. कंदमुळे आणि फळभाज्यांवर भर द्यावा. उदा. सुरण, भोपळा, दुधी, वांगी, तोंडली, पडवळ, भेंडी इत्यादी. अर्थात या ऋतूत काही खास पावसाळी पालेभाज्या उपलब्ध असतात. जसे खोडशी, भारंगी, टाकळा, घोळ या भाज्या स्वच्छ कोमट पाण्याने दोन-तीन वेळेला धुऊन वापराव्यात. जीवनसत्त्व ‘क’युक्त भाज्या जसे टोमॅटो, लाल, पिवळी व हिरवी भोपळी मिरची, बटाटा व रताळीसुद्धा आहारात असाव्यात. जीवनसत्त्व ‘क’युक्त फळे म्हणजे पेरू, संत्री, मोसंबी, द्राक्ष, अननस, पपई, स्ट्रॉबेरी, आंबा तर रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. इतर फळांमध्ये सफरचंद, चिकू, पेर, चेरी, पीच, डाळिंब व पपया ही फळे साले काढून खावीत अथवा स्वच्छ पाण्याने धुऊन किंवा कोमट पाण्यात थोड्या वेळ ठेवून मगच खावीत. साल सोलून खाण्यासारखी फळे जसे केळे, संत्री, मोसंबी, लिची तर उत्तमच. या ऋतूत जांभळाचा सीझन असतो. खूप गुणकारी असल्याने जांभळे स्वच्छ पाण्याने धुऊन जरूर खावीत. पावसाळ्यात कलिंगडाच्या शेतात मात्र पाणी साठल्यामुळे फ्रुट रॉट, डाऊनी मिल्ड्यू असे काही आजार पसरू शकतात म्हणून कलिंगड हे फळ टाळावे. ४ पावसाळ्यात आद्रता वाढल्यामुळे आपली पचनशक्ती मंदावते. खूप प्रमाणात मेद असलेले बटर, क्रीम, चीज व तळलेले पदार्थ तसेच खूप प्रमाणात मैदा व साखर असलेले पदार्थ पचायला जड असल्याने रोज खाणे टाळावे. यामुळे पचनसंस्थेवर ताण येऊन अतिआम्लता, पोटफुगी यांसारखे त्रास होऊ शकतात. हवाबंद डब्यातील अन्नही खाऊ नये, कारण त्यात खूप प्रमाणात परिरक्षक असतात आणि हे पचनसंस्थेला हानिकारक असते. सहज पचेल असा आहार असावा. ५ रस्त्यावरील विक्रेत्यांकडून सॅण्डविच, भेळ व इतर चायनीझ भेळ इत्यादी कच्च्या भाज्या असलेले किंवा चटण्या घातलेले पदार्थ खाऊ नयेत. बाहेर खाण्याची क्वचित वेळ आलीच तर इडली, टोस्ट सॅन्डविच असे गरम पदार्थ खावेत. रस्त्यावर कापलेली फळे व फळाचा रसही पिऊ नये. ६ बाहेरून आणलेली मिठाई, पेढे, बर्फी व इतर दुग्धजन्य पदार्थ टाळावेत. हे पदार्थ या ऋतूत लवकर खराब होऊ शकतात आणि विषबाधा होऊ शकते. ७ पावसाळ्यात पाणी गढूळ होण्याची शक्यता वाढते. पाणी नेहमी उकळून प्यावे. बाहेर जाताना शक्यतो स्वत:ची बाटली भरून न्यावी. ८ सर्दी, खोकला यापासून बचाव करण्यासाठी थंड पेये, शीतपेये टाळावीत. आले घातलेला चहा, हळद घालून दूध तसेच धने, जिरे, हळद, तुळशीची पाने, किसलेले आले, सुंठ पूड, जेष्ठमध, बडीशेप, एखादी लवंग, वेलची, दालचिनी घालून काढा अशी काही गरम पेये प्यावीत.