एअरटेल किंवा व्होडाफोन-आयडियाच्या नेटवर्कद्वारे एखाद्याला फोन केल्यास फोनची रिंग आता २५ सेकंदांसाठीच वाजेल. रिलायंस जिओने काही दिवसांपूर्वीच आपल्या आऊटगोइंग कॉलची रिंग ड्युरेशन ५ सेकंद वाढवून २५ सेकंद केली होती. त्यानंतर यावरुन टेलिकॉम कंपन्यांमध्ये वेगळाच वाद रंगला होता. एअरटेलने जिओच्या या निर्णयाला विरोध केला होता.
एअरटेलने आपलं नेटवर्क असलेल्या सर्व सर्कलमध्ये आऊटगोइंग कॉलची रिंग ड्युरेशन ३५ ते ४० सेकंदांवरुन २५ सेकंद केली आहे. तर व्होडाफोनच्या काही सर्कलमध्ये याला सुरूवात झाली आहे. लहान रिंग अलर्ट असल्यास मिस्ड कॉल्सची संख्या वाढते. परिणामी जिओच्या नेटवर्कवर जास्त रिटर्न कॉल्स येतात. त्यामुळे अन्य टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत जिओला आपला इंटरकनेक्शन युसेज चार्ज पेआऊट कमी करण्यास यामुळे मदत मिळते, असा आरोप एअरटेलकडून करण्यात आला होता. दुसरीकडे जिओने हा आरोप फेटाळून लावत १५-२० सेकंदांची कॉल ड्युरेशन जागतिक मानांकनानुसार असल्याचा दावा केला होता.
आणखी वाचा : Jio ची दिवाळी बंपर ऑफर, १५०० रुपयांचा फोन केवळ ६९९ रुपयांत !
टेलिकॉम कंपन्यांची ६ सप्टेंबर रोजी ट्रायसोबत एक बैठक झाली होती. यामध्ये एअरटेल, वोडाफोन, बीएसएनएल आणि एमटीएनएलने भाग घेतला होता. यात कंपन्यांनी रिंग वाजण्याची किमान मर्यादा ३० सेकंद ठेवली जाण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. ही वेळ कंपनी आणि ग्राहक दोघांच्या हिताची असल्याचं या कंपन्यांचं म्हणणं होतं. तर, कॉलचं उत्तर देण्यासाठी २० सेकंदांचा वेळ पुरेसा आहे. हा वेळ वाढला तर स्पेक्ट्रम रिसोर्स वाया जातात. १५-२० सेकंदांची कॉल ड्युरेशन जागतिक मानांकनानुसार असल्याचा दावा जिओने केला होता. अखेर, ट्रायने कंपन्यांना याबाबत सहमतीने निर्णय घेण्यास सांगितल्यानंतर एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियानेही जिओप्रमाणेच आऊटगोइंग कॉल रिंग ड्युरेशन २५ सेकंदच करण्याचा निर्णय घेतला आहे.