Oily And Spicy food: भारतीय पदार्थ मसाल्यांशिवाय अपूर्ण आहेत, म्हणूनच भारतीय पदार्थांमध्ये तेल आणि मसाल्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. खरंतर अनेकांच्या मते तेल आणि मसाल्यांमुळे अन्नपदार्थ अधिक चविष्ट होतात. मात्र, सतत अशा पदार्थांचे सेवन केल्याने आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. बऱ्याचदा जेवण बनवताना तेल आणि मसाले अधिक वापरल्याने पदार्थांची चवदेखील खराब होते. शिवाय सतत अशा पदार्थांचे सेवन केल्याने वजनही मोठ्या प्रमाणात वाढू शकते. अधिक तेलकट आणि मसाल्याचे पदार्थ खाल्ल्याने लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच त्याचा त्रास होऊ शकतो.
तेलकट पदार्थ खाण्याचे तोटे
तेलकट पदार्थांचे सेवन सतत केल्याने वजन मोठ्या प्रमाणात वाढते. कारण, तळलेल्या पदार्थांमध्ये भरपूर कॅलरीज असतात. यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते आणि शरीरात चरबीचे प्रमाण वाढू शकते. जर तुम्ही तळलेले अन्नपदार्थ खाण्याची सवय वेळेवर नियंत्रित केली नाही तर यामुळे लठ्ठपणादेखील येऊ शकतो.
रोज तळलेले अन्न खाल्ल्यास ते रक्तदाबाची पातळी वाढवू शकते आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करू शकते. सहाजिकच यामुळे लठ्ठपणा निर्माण होऊ शकतो. लठ्ठपणा हा जरी आजार नसला तरी तो इतर अनेक घातक आजारांना कारणीभूत ठरू शकतो. यामध्ये हृदयाशी संबंधित आजारांचाही समावेश होतो.
जर एखादी व्यक्ती दररोज तळलेले अन्न खात असेल तर त्या व्यक्तीच्या शरीरात टाइप २ मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
मसाल्याचे पदार्थ खाण्याचे तोटे
सतत मसालेदार अन्न खाल्ल्याने तुमचे पोट खराब होऊ शकते, तसेच यामुळे लूज मोशनची समस्यादेखील निर्माण होऊ शकते.
मसाल्याचे पदार्थ खाल्ल्यानंतर पोटात जास्त जळजळ होते. याच्या अधिक सेवनाने मळमळ, उलट्या, पोटदुखी, छातीत जळजळ आणि गॅसची समस्या उद्भवते.
मसालेदार पदार्थ यकृतासाठी खूप धोकादायक आहेत. जास्त तेल आणि मसाले असलेल्या अन्नातील तेल यकृतात अडकते आणि यामुळे यकृतामध्ये चरबी जमा होऊ लागते, ज्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या उद्भवते.
मसालेदार पदार्थांमुळे यकृताचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, ज्यामुळे यकृताचा सिरोसिस होऊ शकतो.
मसालेदार अन्न पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट अधिक असते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलही वाढते. कोलेस्ट्रॉल वाढल्याने त्याचा रक्तदाबावर परिणाम होतो, ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
निरोगी आरोग्यासाठी रोजच्या आहारात तेलाचा वापर कमी करावा. तसेच मसाले, मीठदेखील कमी प्रमाणात वापरावे; जेणे करून भविष्यात या सर्व समस्यांचा सामना उद्भवणार नाही.