नवी दिल्ली : करोनाउत्तर जगात शारीरिक आरोग्याचे जितके महत्त्व निर्माण झाले, तितकेच मानसिक आरोग्य जपण्याचीही गरज तज्ज्ञांकडून तीव्रपणे व्यक्त होत आहे. कारण करोना काळात जगभरातील नागरिकांना विविध प्रकारच्या मानसिक आजारांनी ग्रासले होते. सध्या आपण एका वेगळय़ाच युगात राहत आहोत. आपल्याला वाटते की आपण सर्वत्र उपस्थित असावे. आपण सगळय़ांबरोबर जोडले जावे. परंतु समाजमाध्यामांनी आपल्याला समाजविरोधी बनवले आहे, जे आपले अपेक्षेपेक्षा जास्त नुकसान करत आहेत. विशेषत: आपल्या मानसिक आरोग्यावर अधिक परिणाम होत आहे. मानसिक आरोग्याची काळजी घेताना ध्यान महत्त्वाचे आहे. ध्यान करणे अत्यंत सोपे आहे. ध्यान कसे करायचे, हे शिकण्यास उत्सुक असल्यास अनेक अॅप्स आहेत. परंतु जर तुमचे मन एकाग्र होऊ शकत नसेल किंवा मनातील गोंधळ कमी होत नसेल तर विविध छंद अंगिकारण्याची गरज आहे. चित्रे काढणे, विणकाम करणे,पुस्तके वाचणे, स्वयंपाक करणे असे अनेक पर्याय त्यासाठी निवडता येतील. गरज कशाची? समाज माध्यमांवर अधिक वेळ राहणे टाळणे आवश्यक. दररोज ध्यानधारणा आणि व्यायाम करणे गरजेचे. ग्रंथवाचनामुळेही एकाग्रता कमावता येते. छंदांमुळे मानसिक बळ वाढते.