नवी दिल्ली : स्वयंपाकघरात आधीच वापरलेल्या तेलात पुन्हा-पुन्हा पदार्थ तळणे अगदी सामान्य बाब असली, तरी ती आरोग्यासाठी घातक बनून शरीरातील जळजळीचे प्रमुख कारण ठरू शकते. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणच्या (एफएसएसएआय) मते, स्वयंपाकाचे तेल पुन्हा-पुन्हा गरम केल्याने त्यात विषारी घटक तयार होतात. असे पदार्थ खाल्ल्यामुळे जळजळ आणि विविध प्रकारचे आजार होतात. ‘एफएसएसएआय’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तेलाचा आवश्यकतेनुसार एकदाच किंवा कमीत कमी वेळा वापर व्हायला हवा. तीन वेळांहून अधिक काळ तेल गरम केल्यास त्याचे दुष्परिणाम जाणवू शकतात. तज्ज्ञांच्या मतानुसार वारंवार तेल गरम केल्याने तेलात रासायनिक बदल होतात. ते विषाप्रमाणे कार्य करू लागते. त्यामुळे अशा तेलात तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे तणाव, उच्च रक्तदाब या आरोग्य समस्या उद्भवू शकतात. अशा तेलातील पदार्थ सेवन केल्यामुळे पोटात जळजळ, घशाच्या समस्या आणि इतर आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला नेहमीपेक्षा जास्त आम्लपित्ताचा त्रास जाणवत असेल तर त्यांनी रस्त्याच्या बाजूला हातगाडीवरील तयार केलेले तळलेले पदार्थ खाणे टाळावेत. जेव्हा तेलाचा पुन्हा-पुन्हा वापर केला जातो तेव्हा त्यात घातक आम्ल तयार होते. त्यामुळे त्या तेलातील पदार्थामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका वाढतो. तसेच असे पदार्थ कर्करोगाला आमंत्रण देणारेही ठरतात.