Never Reheat This Food Items: भात उरलाय? थांब सकाळी उठून फोडणीचा भात करू. पोळी उरलीये? मस्त गरम करून कडक करून खाऊ! सकाळचा चहा जास्तच मापात बनवला होता जाऊदे संध्याकाळी गरम करून पिऊन घेऊ. ही मानसिकता कितीही पैसे वाचवणारी, काटकसर करणारी व वस्तूंची मूल्य जाणणारी असली तरी त्यातून शरीराचं अनेकदा नुकसान होऊ शकतं. क्लिनिकल आहारतज्ज्ञ गरिमा गोयल यांनी अलीकडेच इंडियन एक्सस्प्रेससह बोलताना काही पदार्थांना पुन्हा गरम केल्याने होणारे घातक परिणाम सांगितले आहेत. केवळ चव व पोतच नव्हे तर पौष्टिक मूल्य कमी करण्यासाठी, अन्नातून विषबाधा होण्यासाठी सुद्धा हे ‘रिहिटिंग’ कारण ठरू शकतं. असे कोणते पदार्थ आहेत जे पुन्हा गरम करू नयेत, हे आज आपण पाहणार आहोत.

चुकूनही पुन्हा गरम करू नयेत ‘हे’ ५ पदार्थ

चहा

चहामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल सारखी संयुगे असतात, जी चव आणि आरोग्यासाठी योगदान देतात. जेव्हा चहा सुरुवातीला तयार केला जातो तेव्हा टॅनिन आणि कॅटेचिन अशी संयुगे सक्रिय होतात पण चहा पुन्हा गरम केल्याने ही संयुगे खराब होऊ शकतात, ज्यामुळे चव कमी होतेचा पण संभाव्य फायदे सुद्धा कमी होतात. चहामधील कॅफिन सुद्धा पुन्हा गरम केल्यावर घट्ट होऊ शकते. अधिक कॅफिन हे पोट बिघडण्याचे किंवा झोप कमी होण्याचे कारण ठरते. चहा गरम करताना संयुगे तुटल्याने ph पातळी सुद्धा कमी जास्त होते व परिणामी सेवनानंतर आम्लता वाढू शकते.

चहा बनवल्यावर बराच वेळ तसाच राहिल्यास सुद्धा चहा आम्लयुक्त होऊ शकतो. ॲसिड रिफ्लक्स किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या असल्यास खूप वेळ ठेवलेला, थंड झालेला किंवा पुन्हा गरम केलेला चहा चुकूनही पिऊ नये.

पालक

पालक पुन्हा गरम केल्याने व्हिटॅमिन सी आणि बी यांसारखी पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे कमी होऊ शकतात, ज्यामुळे त्याचे पौष्टिक मूल्य कमी होते. पालक हा लोहाचा समृद्ध स्रोत आहे पण पालक शिजवून पुन्हा गरम केल्यावर पालकातील लोहाचे हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात येऊन ऑक्सिडेशन होऊ शकते. या ऑक्सिडेशन प्रक्रियेमुळे आयर्न ऑक्साईड्स तयार होतात, ज्यामुळे पालकाचा रंग आणि चव बदलू शकते. ऑक्सिडाइज्ड लोह नॉन-ऑक्सिडायझ्ड लोहाच्या तुलनेत शरीराद्वारे सहजपणे शोषले जाऊ शकत नाही. पुन्हा गरम केल्यावर पालकाच्या भाजीचा पोत सुद्धा पातळ होतो व चव कडू होऊ शकते.

स्वयंपाकाचे तेल

जेव्हा स्वयंपाकाचे तेल पुन्हा गरम केले जाते तेव्हा त्यात रासायनिक बदल होतात ज्यामुळे त्याची गुणवत्ता खराब होऊ शकते. वारंवार गरम करणे आणि थंड होण्याच्या चक्रामुळे ट्रान्स फॅट्स आणि अल्डीहाइड्ससारखी हानिकारक संयुगे तयार होतात, जी जळजळ आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचे कारण ठरतात. त्यामुळे ताजे तेल वापरण्याला प्राधान्य द्या.

मशरूम

मशरूम सच्छिद्र असतात आणि ते सहजपणे ओलावा शोषून घेतात परिणामी यात जिवाणूंची वाढ लगेच होते. मशरूम पुन्हा गरम केल्याने बॅक्टेरियाच्या वाढीस चालना मिळते आणि अन्नजन्य आजाराचा धोका वाढतो. शिवाय, मशरूममध्ये पॉलिसेकेराइड्ससारखे काही संयुगे असतात, जी पुन्हा गरम केल्यावर एन्झाईमॅटिक प्रतिक्रिया देऊ शकतात, याने पदार्थाची चव आणि पोत बदलू शकते.

मशरूममध्ये एंजाइम आणि विविध प्रथिने असतात, ज्यामुळे चव वाढते व पौष्टिक प्रोफाइल सुद्धा बळकट होते. पुन्हा गरम केल्यावर प्रोटिन्सची संरचना बिघडू शकते. मशरूम पुन्हा गरम केल्याने हायड्रोलिसिससारख्या प्रक्रिया होतात ज्या त्यांच्या चव आणि पचनक्षमतेवर परिणाम करतात. प्रथिनांचा ऱ्हास कमी करण्यासाठी आणि मशरूमची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी, पहिल्यांदा शिजवताना देखील अगदी मंद आचेवर गरम करा आणि दुसऱ्यांदा गरम तर करणे टाळाच.

हे ही वाचा<< सहा महिने की बारा महिने, बाळाला गायीचे दूध केव्हा देऊ शकता? WHO चे नवे मार्गदर्शक तत्व काय सांगतात? जाणून घ्या

भात

भातामध्ये सामान्यतः आढळणारा बॅसिलस सेरियस हा जिवाणू स्वयंपाक प्रक्रियेत टिकून राहू शकतो पण भात खोलीच्या तापमानात दीर्घ कालावधीसाठी ठेवल्यास वाढू शकतो. भात पुन्हा गरम केल्याने हे घातक जीवाणू बाहेर पडतात, ज्यामुळे अन्नातून विषबाधा होऊ शकते. पुन्हा गरम केलेला भात कोरडा सुद्धा पडतो ज्यामुळे पचनक्षमता कमी होऊ शकते. शक्यतो भात साठवून ठेवायचा असेलच तर फ्रीजमध्ये ठेवावा. एक ते दोन दिवसांच्या पेक्षा जास्त भात ठेवूच नये.