वैद्य अश्विन सावंत हिवाळ्यातल्या गारठ्याचा शरीरावर होणारा एक दुष्परिणाम म्हणजे सांध्यांना होणारा त्रास. त्यात अधिक तुम्ही रात्री झोपताना जेव्हा पंखा लावता तेव्हा त्यांचा सांध्यांना अधिक त्रास होतो. पंखा जरी कमीतकमी वेगावर ठेवला तरी सर्व घरांची विद्युत उपकरणे बंद झाल्यानंतर पंख्याला अधिक विद्युत उर्जा मिळून तो अधिक वेगाने फिरतो. शिवाय रात्री बाहेरचे तापमान जसजसे उतरत जाते, तसतशी झोपायची खोली अधिकाधिक थंड होत जाते, हे लक्षात घ्यायला हवे. या थंड वातावरणाचा शरीरावर बाधक परिणाम होतो. थंडीच्या दिवसांमध्ये रात्री पंख्याखाली किंवा एसीमध्ये झोपण्यामुळे नाक-घसा-श्वासनलिका आदी श्वसनवह संस्थानावर वर होणारा प्रभाव व त्याच्या परिणामी सर्दी-खोकला-ताप-दमा अशा तक्रारी कशा सुरु होतात किंवा असल्या तर बळावतात. त्याचप्रमाणे या थंडीचा हाडांवर व सांध्यांवरही परिणाम होतो. मुळात हाडे सच्छिद्र असल्याने त्यामध्ये वार्याचा सहज संचार होतो.सहा-सात तास हाडांवर होणार्या थंड वार्याच्या मार्यामुळे सच्छिद्र हाडांमध्ये वार्याचा संचार अधिकच वाढतो.अशा व्यक्तींना सकाळी उठल्यावर हाडे हलकी झाल्यासारखे वाटते ,त्याचे कारण आता तुमच्या लक्षात आले असेल. दुसरीकडे या थंड वार्याचा सांध्यांवर सातत्याने होणारा मारा हा सांध्यांमधील श्लेष्मल आवरणाची सूजही वाढवतो. श्लेष्मल आवरणाची सूज असेल तर सकाळी सांधे जड होतात व आखडतात. हेही वाचा >>>सारखं काहीतरी गोड खाण्याची तीव्र इच्छा होतेय? डॉक्टरांकडून जाणून घ्या उपाय त्यात अधिक योग्य पोषणाचा अभाव ,व्यायामाचा व चलनवलनाचा अभाव,एखादे विशिष्ट काम किंवा क्रिया पुन्हापुन्हा करावी लागणे,एकाच अवस्थेमध्ये दीर्घकाळ उभे राहावे वा बसावे लागणे,अनुवंशिकता आदी कारणांमुळे ज्यांची हाडे व सांधे मुळातच निरोगी नसतात,त्यांना वरील त्रास तीव्रतेने होतो.संधिविकारांच्या विविध कारणांचा विचार करताना या ऋतुसंबंधित कारणांचाही विचार व्हायला हवा. हिवाळ्यात वातप्रकोप होण्याची शक्यता? (चरकसंहिता १.६.९,१०) हेमंत ऋतूमध्ये अग्नी बलवान असतो, म्हणजे भूक व पचनशक्ती प्रखर असते. साहजिकच त्या बलवान अग्नीला आहार सुद्धा तसाच बलवान द्यावा लागतो, जसा की स्निग्ध (तेल-तूप असा स्नेहयुक्त),पचायला जड व ज्याच्या-त्याच्या भुकेनुसार पर्याप्त मात्रेमध्ये. मात्र असा आहार न घेता एखाद्या व्यक्तीने जर स्नेहविरहित असा कोरड्या गुणांचा व सहज पचेल असा हलका आहार तोसुद्धा कमी प्रमाणात सेवन केला किंवा लंघन केले तर अग्नी सर्वप्रथम उपलब्ध आहे त्या आहाराचे ज्वलन करुन उर्जानिर्मिती करतो.परंतु ती उर्जा पुरेशी नसल्यास देह-धातुंचे (body tissues)चे भक्षण करु लागतो. हेही वाचा >>>फ्रीजमध्ये ठेवल्यास ‘या’ भाज्या व फळे लगेचच बनतात विषारी? आयुर्वेद तज्ज्ञ व डॉक्टरांची माहिती, काय करावे उपाय? अर्थात शरीराला हवी असलेली उर्जा निर्माण करण्यासाठी शरीर-घटकांचाच उपयोग केला जातो.त्यामध्ये सर्वप्रथम रस धातूचा क्षय (झीज) होते,जे शरीरामध्ये वात वाढण्यास कारणीभूत होते.हेमंतामध्ये वातप्रकोप संभवण्याचे हे महत्त्वाचे कारण. याशिवाय वात (वायू) हा मुळात शीत गुणांचा असल्याने हेमंत ऋतूमध्ये वाढलेले शीतत्व (थंडावा) वायूचा शीत गुण वाढवून वातप्रकोपास कारणीभूत होऊ शकते, ज्याचे विधान चरकसंहितेचे भाष्यकार चक्रपाणी सुद्धा करतात. हिवाळ्यात हवेत वाढणारे रुक्षत्व (कोरडेपणा) सुद्धा शरीरामध्ये वाताचा रूक्ष गुण वाढवून वात वाढवते. या सर्व कारणांपायी हिवाळ्यात वात वाढून वातविकार होण्याची शक्यता बळावते. हिवाळ्यात सांध्यांचे आजार का बळावतात याचे आयुर्वेदाने दिलेले हे स्पष्टीकरण.