बदलत्या जीवनशैलीचे आणि वाढत्या प्रदूषणाचे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतात. त्यातच सतत उघड्यावरील अन्नपदार्थ, थंड पदार्थांचे सेवन केल्यामुळे छातीत कफ जमा होण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. छातीत कफ जमा झाल्यास छातीत दुखणे, खोकला येणे, चक्कर येणे यासारख्या आरोग्याच्या तक्रारी सुरु होतात. यावर वेळीच उपाय न केल्यास काही वेळा कठीण परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे दरवेळी कफावर उपाय म्हणून गोळ्या किंवा सिरप घेण्यापेक्षा कधीतरी आजीबाईच्या बटव्यातील या पदार्थांचा वापर करुन बघायला हवा.
१. गरम पाण्याची वाफ – काही वेळा छातीत कफ जमा झाल्यास छातीत दुखू लागते. यावेळी कोणत्याही औषधांचा वापर करण्यापेक्षा सरळ गरम पाण्याची वाफ घ्यावी. त्यामुळे कफ मोकळा होऊन श्वसनाचा मार्ग मोकळा होतो. त्यामुळे शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा होऊ लागतो. वाफ घेण्यापूर्वी गरम पाण्यात पेपरमेटं अॅसेशिंयल तेलाचे एक-दोन थेंब टाकावेत. या पाण्याची वाफ दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यास नक्कीच आराम पडू शकतो.
२ अॅप्पल सायडर व्हिनेगर – अॅप्पल सायडर व्हिनेगरच्या मदतीने कफ कमी होण्यास मदत होते. या व्हिनेगरमध्ये अँटी-बॅक्टेरिअलचे प्रमाण अधिक असल्यामुळे छातीतील संसर्ग कमी होतो. त्यासाठी २ चमचे अॅप्पल सायडर व्हिनेगर एक कप पाण्यात मिसळून हे पाणी आठवड्यातून २-३ वेळा घ्यावे या उपायामुळे नक्कीच फरक जाणवून येतो.
३. हळद- हळद ही केवळ स्वयंपाकासाठी किंवा सुंदर दिसण्यासाठीच नाही तर आरोग्यविषयक समस्यांवरही उपयुक्त ठरते. हळदीच्या सेवनामुळे घसा साफ होण्यास मदत मिळते. घसा दुखत असल्यास एका गरम पाण्यात एक चमचा हळद मिसळून या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. तसेच हळद घालून गरम दुधात प्यायल्यासही छातीतील कफ कमी होतो.
४. आलं- आजीच्या बटव्यातील महत्वाचा पदार्थ म्हणजे आलं. तिखटं चवीच्या आल्यामध्ये पॉलिफिनोसचे प्रमाण मुबलक प्रमाणात असते. पॉलिफिनोसमुळे छातीत जमा झालेला कफ मोकळा होतो. तसेच कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाल्यास तोदेखील दूर करण्यास मदत होते.
५.कांदा – सतत डोळ्यात पाणी आणणारा कांदा आरोग्यासाठी फार उपयोगी आहे. कांद्यामध्ये असलेला अॅटी-मायक्रोबिअल हा घटक छातीमध्ये झालेला संसर्ग दूर करतो. छातीत दूखत असल्यास कांद्याचे आवर्जुन सेवन करावे. यासाठी एका लिंबूचा आणि एका कांद्याचा रस समप्रमाणात घ्यावा. त्यानंतर गरम पाणी आणि मध यांच्याबरोबर हा रस दिवसातून ३-४ वेळा घ्यावा. यामुळे कफ मोकळा होण्यास मदत होऊन अन्नप्रक्रियाही सुरळीत होते.