काळ जरी बदलला असला तरीदेखील आतासुद्धा काही जण शुभ-अशुभ या गोष्टींकडे लक्ष देतात. काही ठिकाणी तर प्राणी, पक्षी, जनावर यांना सुद्धा अशुभ मानलं जातं. त्यातलाच एक सरपटणारा प्राणी म्हणजे पाल. देशात अनेक जण पालीला अशुभ मानतात. त्यामुळे शुभ कार्याच्या दिवसांमध्ये तिचं दर्शन होणं किंवा ती अंगावर पडणं अशुभ मानलं जातं. मात्र पाल अशुभ नसून पालीविषयी समाजात अनेक समज- गैरसमज आहेत. पाल घरात पाहिल्यानंतर अनेकांना किळस वाटते. यातूनच मग तिला घरातून हकलून लावण्यासाठी अनेक वेळा विविध लिक्विड, पावडरच्या माध्यमातून तिला मारण्याचा किंवा पळवून लावण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र त्याचा काही परिणाम होत नाही. अशा वेळी काही घरगुती उपायांमुळे पालीला पळवून लावता येऊ शकते. १. कॉफी पावडर आणि तंबाखू - कॉफी पावडर आणि तंबाखू या दोघांनाही उग्र दर्प येतो. त्यामुळे कॉफी पावडर आणि तंबाखू एकत्र करुन त्याचे लहान लहान गोळे करुन घरातील कोपऱ्यांमध्ये ठेवा. हे मिश्रण पालीने खाल्यानंतर एकतर पालीचा मृत्यू होतो किंवा ती पुन्हा त्या ठिकाणी फिरकत नाही. २. मोरपंख - पाली मोरपंखाला प्रचंड घाबरतात. त्या मोरपंखाला साप समजतात आणि हा साप आपल्याला खाईल या भीतीने त्या घरात येत नाहीत. त्यामुळे घरामध्ये मोरपंख ठेवावा. ३. डांबर गोळ्या - डांबर गोळ्या या उत्तम किटकनाशक असतात. त्यामुळे घराच्या कोपऱ्यांमध्ये त्या ठेवाव्यात. शक्यतो, वॉर्डरोब आणि वॉशबेसिनमध्ये या गोळ्या ठेवाव्यात. ४. पाणी आणि मिरपूड - पाणी आणि मिरपूड मिसळून मिश्रण तयार करा. हे मिश्रण किचन, बाथरूम, सिंक, व घरातील कोपर्यामध्ये शिंपडा. या उग्र वासामुळे पाली पळतात. ५. अंड्याचे साल - अंड्याच्या कवचाला प्रचंड उग्रवास येत असतो. हा वास पालींना सहन होत नाही. त्यासोबतच अंड्याचं कवच पाहिल्यानंतर तो कोणतातरी जीव असल्याचा भास पालींना होतो. त्यामुळे त्या अंड्याचं कवच पाहिल्यानंतर पाली पळतात. ६. बर्फाचे पाणी- घरात पाल आढळल्यावर तिच्यावर बर्फाच्या थंड पाण्याचा शिडकावा करावा. पालीला गार पाणी सहन होत नाही. त्यामुळे ती पुन्हा त्या जागी फिरकत नाही. ७. कांदा - कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्यातून प्रचंड तीव्र वास बाहेर पडतो. हा वास पालींना सहन होत नाही. त्यामुळे कांद्याचे पातळ काप करुन ते लाईटजवळ ठेवावेत. त्यामुळे पाली येणार नाहीत.