नवी दिल्ली : भारतात २०३१ पर्यंत ज्येष्ठ नागरिकांची संख्या १९ कोटी ४० लाखांपर्यंत (४१ टक्के) जाईल, असा अंदाज आहे. वय जसे वाढू लागते तसे मूत्रिपडासह अनेक अवयवांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ लागतो. चाळिशीनंतर शरीरातील सोडियमवर परिणाम होऊ लागतो. या विकारास वैद्यकीय परिभाषेत ‘हायपरनेट्रेमिया’ म्हणतात. त्यामुळे रक्तातील सोडियमच्या संतुलनावर व ‘हायपरक्लेमिया’ या विकारात पोटॅशियमच्या प्रमाणावर परिणाम होतो. ज्येष्ठ नागरिकांत ही समस्या जास्त प्रमाणात आढळते. सोडियम-पोटॅशियमसारखी शरीरास ऊर्जा देणारी महत्त्वाची खनिजे मानली जातात. त्यांच्यासह कॅल्शियम, मॅग्नेशियमही शरीरासाठी महत्त्वाची असतात.

या खनिजांचा शरीराला योग्य प्रमाणात पुरवठा होण्यासाठी योग्य अन्नसेवन गरजेचे असते. उतारवयात शरीरात या खनिजांचे प्रमाण योग्य आहे अथवा नाही यावर सातत्याने लक्ष ठेवणे गरजेचे असते. तरुणांपेक्षा ज्येष्ठांमध्ये या सोडियम-पोटॅशियमसारख्या खनिजांचे संतुलन घटण्यामागे अनेक कारणे असतात. ज्येष्ठांमध्ये विविध रोग-विकारांवर विविध औषधोपचार सुरू असल्याने या संतुलनावर दुष्परिणाम होतो. ज्येष्ठांमधील पचनक्षमता घटल्याने अन्न व पाणी सेवनाचे प्रमाण घटते. त्यामुळे त्यांच्या निर्जलीकरणाचे प्रमाण वाढते. त्यामुळे त्यांच्या अन्नसेवन व जलसेवनावर नीट लक्ष देणे गरजेचे असते. ज्येष्ठांमध्ये निर्जलीकरण वाढल्याची लक्षणे म्हणजे त्यांचे तोंड कोरडे पडते. रक्तदाब कमी होतो. तंद्री, चक्कर येणे, गोंधळ-दिशाभूल आदी लक्षणे दिसू लागतात. त्याकडे दुर्लक्ष झाल्यास हा त्रास वाढतो. ज्येष्ठांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढले तरीही या खनिजांचे असंतुलन होते. सतत उलटय़ा होणे, अतिसार, मूत्रिपड-यकृताचे कार्य बिघडणे, कर्करोगावरील उपचार, काही ठरावीक औषधांचे सेवनामुळे हे असंतुलन वाढते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्येष्ठांत लक्षणे दिसत नसतील परंतु सोडियम आणि पोटॅशियम पातळीचे प्रमाण योग्य नसेल तर त्यावर त्वरित उपचार करून ते संतुलित करणे गरजेचे असते. अन्यथा त्यांच्या जिवाला किंवा मेंदूसह महत्त्वाच्या अवयवांना धोका असतो. शिरेवाटे पूरक औषधे देऊन (‘सलाईन’) हे प्रमाण वैद्यकीय निरीक्षणाखाली वाढवता येते. पोटॅशियमच्या कमतरतेसाठी वैद्यकीय देखरेखीखाली पोटॅशियम पूरक आहार घेण्याची शिफारस केली जाते. ज्येष्ठांच्या आरोग्याची गुंतागुंत टाळण्यासाठी या पातळीचे सतत निरीक्षण आणि नियमित तपासणी नेहमीच अत्यंत गरजेची असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.