Never Eat These Vegetables Raw: सुदृढ राहायचं असेल तर आहारात भाज्या व फळांचे महत्त्व नाकारता येणार नाहीत. अनेक आहारतज्ज्ञ भाज्या व फळे खाताना जास्त प्रक्रिया करण्यापेक्षा कच्च्या खाण्याचा सल्ला देतात. पण तुम्हाला माहित आहे का काही भाज्या या कच्च्या खाल्ल्याने फायदे तर सोडा पण उलट डॉक्टरकडे फेऱ्या माराव्या लागू शकतात. आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. डिंपल जांगडा यांनी याविषयी मार्गदर्शन करताना खालील ४ भाज्या कधीच कच्च्या खाऊ नये असा सल्ला दिला आहे. या भाज्यांची नावं पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की विशेषतः ज्यांना चायनीज खायला आवडतं त्यांनी याकडे लक्ष देण्याची विशेष गरज आहे.
डॉ डिंपल जांगडा, यांनी इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले की, काही भाज्यांमध्ये बॅक्टरीया भरपूर असतात. सेवनानंतर हे घातक परजीवी रक्तप्रवाहातून आतडे,मेंदू, यकृतातही प्रवेश करू शकतात. यामुळेच अनेकदा डोकेदुखी, पोटदुखी, स्नायू कडक होणे असे त्रास उद्भवतात. यामुळेच तुम्ही सुद्धा या भाज्या खातना काळजी घ्यायला विसरु नका. चला पाहूया यादी..
कोलोकेसिया (अरबी) पाने
विशेषतः सॅलेडमध्ये काही वेळा कोणत्या पालेभाज्यांचा वापर करावा हे कळत नसल्याने उठसूट कोणतीही हिरवी पाने घातली जातात. अरबीची पाने सुद्धा यातीलच एक भाग आहे. पण चुकूनही तुम्ही या पानांचे सेवन कच्चे करू नये. यातील ऑक्सलेटमुळे घशाचे त्रास उद्भवू शकतात. iThrive येथील फंक्शनल न्यूट्रिशनिस्ट मुग्धा प्रधान सांगतात की, अरबीची पाने, पालक व केल भाजी ही नेहमी गरम पाण्यात उकळून मगच खायला हवी. जेणेकरून ऑक्सलेटसचे प्रमाण संतुलित राहते.
कोबी
चायनीज खायला गेल्यावर अनेकजण शेजवान चटणीबरोबर कोबी खातात. पण मंडळी कच्च्या कोबीमध्ये टेपवर्मची वाढ सहज होत असते. काहीवेळा हे टाळण्यासाठी कोबीवर अत्यंत तीव्र कीटकनाशकांची फवारणी केली जाते, हे कीटकनाशक केवळ पाण्याने धुवून जात नाही त्यामुळे आपण गरम पाण्यात उकळून कोबी शिजवणे हे योग्य ठरेल. कच्च्या कोबीमध्ये गॉइट्रोजेन्स असतात जे थायरॉईडचा त्रास वाढवू शकतात त्यामुळे थायरॉईडच्या रुग्णांनी विशेषतः कोबीचे सेवन कमीच करायला हवे.
भोपळी मिरची
शिमला मिरची कच्ची खाणे हे इतर भाज्यांच्या तुलनेत तसे सुरक्षित आहे. पण त्याआधी तुम्हाला मिरचीचा देठ व बिया काढून नीट पाण्याखाली मिरची धरायलाच हवी. अन्यथा या बियांमधून मिरचीमध्ये पसरलेले टेपवर्म व त्याची अंडी शरीराचे नुकसान करू शकतात.
वांगे
वांग्याच्या बिया देखील टेपवर्मच्या अंड्यांचे घर आहेत याशिवाय वांग्यांमध्ये असणारे अल्कलॉइड्स पचनप्रक्रियेत व्यत्यय आणू शकतात व सांधेदुखी सुद्धा वाढवतात. यामुळे वांगी नीट शिजवल्याशिवाय खाऊ नये.
हे ही वाचा<< ३० दिवस जेवणात तेल वापरणं बंद केल्यास वजन कमी होऊन हृदय राहील स्वस्थ? एका महिन्यात शरीरात काय बदलेल?
दरम्यान, इतरही भाज्या शिजवून खाल्ल्याने अनपेक्षित नुकसानांचा धोका कमी करता येऊ शकतो. जर आपण सेंद्रिय भाज्यांचे सेवन करत असाल तरी त्याच्यावर मातीतील कीटक व परजीवी असू शकतात. अशावेळी नुसतं पाण्याने धुतल्याने भाजी स्वच्छ होत नाही. शक्य असल्यास बेकिंग सोडा किंवा व्हेनिगरच्या पाण्याने या भाज्या स्वच्छ कराव्यात जेणेकरून जीवजंतू नष्ट होण्यास मदत होईल.